पुणे – विमा कंपनी आणि अपघाती मृत्यू झालेल्या साईट इंजिनिअरच्या कुटुंबियांमध्ये तडजोड झाल्यानंतरही नुकसानभरपाईचा निर्णय होण्यास सात महिन्याचा कालावधी लागला. करोनामुळे न्यायालयीन कामकाजावर झालेल्या परिणामामुळे हा विलंब झाला. त्या इंजिनिअरच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन.पी. धोटे यांच्या न्यायालयात याबाबत तडजोड झाली.
त्या व्यक्तीच्या कुटुंबियांतर्फे ऍड. जी.पी.शिंदे आणि ऍड. सतिश घरत यांनी न्यायालयात बाजू मांडली.
53 वर्षीय माधव (नाव बदलले आहे) आखाती देशात साईट इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यांना दरमहा सुमारे 1 लाख रुपये पगार होता. ते सुट्टी घेऊन देशात आले होते. मूळचे पंजाबी असले, तरीही ते कुटुंब पुण्यात राहते. देशात आल्यानंतर सहलीसाठी हिमाचल प्रदेश येथे गेले होते. कुलू-मनाली येथून हरियाणा राज्याच्या परिवहन बसने चंदीगढकडे चालले होते.
त्यावेळी बस दरीत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या दोन मुली, एक मुलगा आणि आईने नुकनास भरपाई मिळावी, यासाठी हरियाणा परिवहन आणि विमा कंपनी असलेल्या दि न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे ऍड. जी.पी.शिंदे आणि ऍड. सतिश घरत यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. नुकसान भरपाईची रक्कम कोटी रुपयांमध्ये असल्याने विमा कंपनीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात फेब्रुवारीमध्ये तडजोड झाली. त्यानंतर करोनामुळे न्यायालयीन कामकाज बंद होते.