मुंबई – नव्या कंपन्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार पुढाकार घेत असून 2021 या वर्षात आतापर्यंत 63 प्राथमिक समभाग विक्रीमधून म्हणजे आयपीओमधून या नव्या कंपन्यांनी तब्बल 1.18 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. 2020 मध्ये केवळ 15 आयपीओमधून 26,613 कोटी रुपये जमा झाले होते. 2017 मध्ये आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी 68,827 कोटी रुपये जमा झाले होते. या घडामोडी संदर्भात प्राईम डाटाबेस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव हलदीया यांनी सांगितले की, ज्या कंपन्यांची शेअर बाजारावर नोंदणी झाली आहे. त्यातील बऱ्याच कंपन्या तोट्यात आहेत.
मात्र भविष्यामध्ये या कंपन्यांचा नफा वाढेल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. भारतामध्ये रिटेल गुंतवणूकदारांची संख्या नऊ कोटीवर गेली आहे. यातील काही नवे गुंतवणूकदार दीर्घ पल्ल्याच्या दृष्टिकोनातून आयपीएलमधील शेअरची खरेदी करीत असल्याचे दिसून येते. पेटीएम कंपनीचा आयपीओ सर्वात मोठा होती. आयपीओमधून कंपनीने 18,300 कोटी रुपये उभे केले. झोमॅटोच्या आयपीओमधून 9,300 कोटी रुपये जमा झाले.
या वर्षी जे 59 आयपीओ जारी केले गेले होते. त्यामधील 36 आयपीओंना दहापट, 6 आयपीओना 100 पट, 8 आयपीओना 3 पट मागणी आली. त्यातील बऱ्याच आयपीओची शेअर बाजारावर नोंदणी झाल्यानंतर शेअरच्या किमती वाढल्याचे दिसून आले. 34 आयपीओच्या किमती आतापर्यंत 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आयपीओचा हा धमाका आगामी काळातही चालूच राहणार असून आणखी 35 कंपन्यांना शेअर बाजार नियंत्रक सेबीने आयपीओ काढण्याची परवानगी दिली आहे. शिवाय एलआयसीचा आयपीओ एप्रिल महिन्यापूर्वी बाजारात येणार आहे.