मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात सभा घेत आहेत. राज ठाकरे यांनी यापूर्वी नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे, महाड येथील सभेतून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणूक लढवनार नसली, तरी भाजप विरोधात त्यांनी चांगलीच टीका सुरु ठेवली आहे.
यापूर्वी, सोलापूर येथील सभेत राज ठाकरे यांनी हरिसाल या डिजिटल गावाच्या जाहिराती संदर्भात पोलखोल केली होती. त्यानंतर रायगड येथील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी, मोदींनी खासदार म्हणून जे नागापूर गाव दत्तक घेतले होते, त्याची पोलखोल व्हिडिओ च्या माध्यमातून केली. तसेच भाजप सरकारच्या डिजिटल योजनेची पोलखोल केल्यानंतर अजून एक धसई या देशातील पहिलं कॅशलेस गावाच्या भाजपच्या योजनेची पोलखोल त्यांनी त्यावेळी केली होती.
त्यानंतर आजच्या सभेत राज ठाकरे यांनी, मोदी है तो मुमकिन है म्हणत मोदी फॉर न्यू इंडियाच्या भाजपच्या जाहिरातीमधील एका कुटुंबाचा फोटो दाखवत, ते कुटुंबच व्यासपीठावर हजर केले. या कुटुंबाचा आणि जाहिरातीचा कोणताही संबध नसल्याचे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पुराव्यानिशी सिद्ध केले. पुढे बोलताना राज ठाकरे यांनी, अशा किती कुटुंबियांचा वापर केला असेल, किती खोटा प्रचार करणार हे लोक करणार आहेत? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला.
तसेच राज ठाकरे यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत, गुप्तचर खात्याकडून चेतावणी मिळाली असताना देखील यावर अंमलबजावणी न करता केवळ युद्ध परिस्थिती निर्माण करण्यासाठीच सरकारने जवानांना मृत्यूच्या खाईत लोटले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याबद्दल पुढे बोलताना राज ठाकरे यांनी गुप्तचर खात्याचे पत्रच जाहीर सभेत सर्वांसमक्ष सादर केले.