धरणाच्या चार तळमोऱ्यांतून 7000 कुसेसने विसर्ग; पाणीपातळी उणे 39 टक्के
रेडा/भिगवण- पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणातून आज (दि. 16) सकाळी 6:00 वाजता धरणाच्या चार तळमोऱ्या उघडून 7000 कुसेसने पाणी सोडण्यात आल्याचे उजनीच्या जलव्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सोलापुरसाठी पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने जलाशयाची पाणीपातळी उणे 39 टक्के वर पोहचली आहे. यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील गावच्या पिण्याचे पाणी योजना बंद पडल्या असून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
सोलापूर शहराची तहान भागविण्यासाठी उजनी धरण क्षेत्रावरील गावांवर अन्याय होत आहे. सध्या, पाणी पातळी इतकी खाली गेली आहे की, छोटी गावे पाणी उपसा करण्यासाठी तिथपर्यंत जाऊच शकत नाहीत आणि गेलीच तर विजेचा प्रश्न आहे. या परिसरातील मदनवाडी, तक्रारवाडीसह भिगवण गावातील नागरिकांना पाणी आता विकत घेण्याची वेळ आली आहे.
सोलापूर शहराची तहान भागविण्यासाठी बुधवार (दि.15) पासून सहा टीएमसी पाणी सोडण्यात येणार येत असल्याने धरण उणे 10 ते 20 टक्क्यांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे धरणाची इतिहासातील नीचांकी पातळीकडे वाटचाल सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उजनीचार पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
उजनीची पाणीपातळी 2012 मध्ये उणे 53.53 टक्के होती. त्यावेळी 1 मे 2012 रोजी धरण उणे पातळीत गेले होते. मात्र, यंदा 45 दिवस अगोदर (15 मार्च 2019) धरणाने उणे पातळी गाठली. पाणी कमी झाल्याने भूभाग तसेच पाण्यासाठी खोदलेल्या चाऱ्याही उघड्या पडल्या आहेत. उजनीच्या घटत्या पाणीपातळीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण धोक्यात आले असून लाखो रुपये खर्च करूनही पाणी हाताला लागत नसल्याने उभी पिके जळून जात असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसू लागला आहे. धरणाच्या 123 टीएमसी पाणी साठ्यापैकी 54 टीएमसी पाणी उपयुक्त तर 63 टीएमसी पाणी साठा हा मृतसाठा म्हणून गृहीत धरला जातो. तर, 6 टीएमसी पाणी अतिरिक्त धरले जाते उजनी धरण 100 टक्के भरल्यानंतर धरणात 117 टीएमसी पाणी साठते, त्याची एकूण टक्केवारी 111 टक्के गृहीत धरली जाते. सध्या, धरणातील 79 टीएमसी पाणी संपले आहे. सात महिन्यात 111 टक्के अधिक तसेच 40 टक्के उणे साठ्यातील असे एकूण 148 टक्के पाणी संपले आहे.
एवढ्या मोठ्या पाणी साठ्याचे योग्य नियोजन झाले नसल्याने उजनी धरण क्षेत्रावर दुष्काळाची छाया पसरली आहे. सध्या, उजनी धरणात मृत साठ्यातील केवळ 43.53 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून जून अखेरपर्यंत हा साठा वापरायचा आहे. त्यातच 15 ते 20 टीएमसी गाळ असण्याची शक्यता असून त्यामुळे धरणात सध्या नेमके किती पाणी आहे हा संशोधनाचा विषय आहे. मृतसाठ्यातील आतापर्यंत 19.59 टीएमसी पाणी वापरले गेले आहे.
- काठांवरील गावात नेत्यांबाबत नाराजी…
जून अखेर उपलब्ध पाण्यावर इंदापूर तालुक्यातील गावांची तहान भागविताना धरण व्यवस्थापन व सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. धरणातील पाण्याचे योग्य नियोजन न करणाऱ्या तसेच यासंदर्भात वेळोवेळी आवाज न उठविणाऱ्या नेत्यांबद्दल उजनी काठांवरील गावात तीव्र नाराजी आहे. दि. 11 मे 2018ला उजनीची पाणी पातळी अधिक 15 टक्के होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही पातळी यंदा 52 टक्क्यांनी कमी असून धरणाच्या इतिहासात प्रथमच पाणीसाठा मार्च महिन्यात अधिक पातळीतून उणे पातळीत गेला आहे.