शासनाने त्वरित पंचनामे करावे : शेतकऱ्यांची मागणी
सोरतापवाडी- गेली पंधरा दिवस पडत असलेल्या पावसामुळे भाजीपाला, फुले व वेलवर्गीय भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे चार महिन्यापूर्वी दुष्काळाने होरपळणारा शेतकरी आता अति पावसामुळे हवालदिल झाला आहे. सोरतापवाडी, नायगाव, पेठ, तरडे परिसरात भाजीपाला, ऊस, फुले मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पंधरा दिवसांपासून संततधार पावसामुळे भाजीपाला काढणे अवघड झाले आहे. त्यामुळे भाजीपाला सडून गेला आहे.
टोमॅटोसह अन्य भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. वेलवर्गीय भाजीपालाचे नुकसान झाले आहे. झेंडू, अस्टर फुलांच्या लागवडी झाल्या होत्या. त्यात आता नागे पडले आहे. लागण विरळ दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन लागवड करावी लागणार आहे. नायगाव येथील नदी परिसरात ऊस पिकात पाणी साठले आहे. कित्येक वर्षांनी विहिरीचे पाणी जमिनीच्या वर आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना पूर्व हवेलीतील सोलापूर महामार्गाच्या परिसरात कोणत्याही राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत.