पुणे – गणपती बाप्पा…मोरयाऽऽऽच्या जयघोषात सोमवारी (दि.2) गणरायाचे आगमन घरोघरी होणार आहे. बाप्पांचे आगमन आणि प्रतिष्ठापना जर शूभमुहूर्तावर झाली, तर त्याचे महत्त्व अधिक वाढते. त्यामुळेच गणरायाचे आगमन आणि प्रतिष्ठापना सूर्योदयापासून दुपारी दीड वाजेपर्यंत करण्यात यावी.
भाद्रपदातील चतुर्थीला गणरायाचे आगमन सर्वत्र होते. त्यानंतर हा उत्सव दहा दिवस सुरू असतो. काही घरांमध्ये दीड दिवसांपासून दहा दिवसांपर्यंत गणपतीची स्थापना करण्यात येते.
“चतुर्थीला पहाटे 6 वाजेपासून गणरायाची प्रतिष्ठापना करता येऊ शकते. त्यानंतर साधारणतः दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंतचा काळ हा प्रतिष्ठापनेसाठी शूभ आहे. त्यातही सकाळी 8 ते 9.30 पर्यंतचा काळ हा अतिउत्तम आहे. दुपारी 12 वाजेच्या आता प्रतिष्ठापना करावी.
गणेश मूर्ती निवडताना काळजी घ्यावी. घरात गणपती विराजमान होणार असेल, तर बसलेली मूर्ती घ्यावी. त्यातही लोडाला टेकून असलेली मूर्ती घेतली तर उत्तम. गणेश मूर्तीची विधिवत पूजा करताना शक्यतो सोवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे,’ अशी माहिती तेजस सप्तर्षी गुरुजी यांनी दिली.