नवी दिल्ली -इयत्ता दहावीप्रमाणेच सीबीएसईच्या बारावी इयत्तेच्याही परीक्षा रद्द केल्या जाव्यात, अशी मागणी कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी केली. सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द करतानाच बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. त्यावर प्रियांका यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारने दहावीच्या परीक्षा अखेर रद्द केल्याचे समाधान वाटते.
आता बारावीसाठीही अंतिम निर्णय घेतला जावा. विद्यार्थ्यांना जूनपर्यंत अनावश्यक ताणाखाली ठेवणे योग्य नाही. आताच निर्णय घेतला जावा, असे त्यांनी म्हटले. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारे पत्र प्रियांका यांनी रविवारी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना पाठवले होते. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही परीक्षा रद्द करण्याचे आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते.