पुणे : सिंहगड रस्ता परिसरातून वाहणाऱ्या वडगाव बुद्रुक भागातील ओढ्याला मागील वर्षी आलेल्या पूरामुळे तीन ते चार जणांना जीव गमावावे लागले. तसेच, मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरून आर्थिक नुकसानही झालेले आहे. असे असतानाही गेल्या वर्षभरात या ओढ्याच्या सुरक्षेकडे महापालिका प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे यंदाही पुराचा धोका निर्माण झाला आहे. पालिकेने तातडीने याबाबत उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
मागीलवर्षी 25 सप्टेंबर रोजी शहराच्या दक्षिण भागात ढागफुटी झाली. त्यानंतर तळजाई टेकडीच्या आसपासच्या भागातील ओढ्यांना पूर आला होता. सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुकमधून ओढा वाहत असून तो नऱ्हे, आंबेगाव बु., दभाडी, प्रेयेजा सिटी असा वाहत जाऊन तो मुठा नदीस मिळतो. 25 सप्टेंबरच्या रात्री या ओढ्यानी रौद्ररूप धारण केले होते. त्यात 5 ते 6 व्यक्तींचे प्राण गेले तसेच असंख्य जनावरे, दुचाकी, चारचाकी रिक्षा-टेम्पो या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. तसेच, शांतीनगर भागातील असंख्य घरांमध्ये पाणी घुसून त्यांचा संसार उद्वस्त झाले आहे. त्यातच वडगाव बुद्रुक स्मशानभूमीच्या लगतच्या ओढ्याला पूर येऊन स्मशानभूमीची संरक्षण भिंत कोसळली होती. या स्मशानभूमीची पावसाळ्यात दुरुस्ती न झाल्यास अनेक अडचणी समोर येणार आहेत. असे असतानाही, मागील वर्षभरात पालिका प्रशासनाकडून या ओढ्याच्या दुरुस्तीसाठी केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू असून या ओढ्याच्या सुरक्षेसाठी काहीच काम केलेले नसल्याचे चित्र आहे. परिणामी पावसाळ्यात पुन्हा या ओढ्यालगतच्या भागाला पूराचा धोका निर्माण झाला आहे.
पावसाळ्यात या ओढ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे ओढ्याच्या डाव्या बाजूला सिमाभिंत बांधणे तसेच स्मशानभूमीची तत्काळ दुरुस्ती करण्यासाठी वारंवार पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबत महापौर, आयुक्त, पथ विभाग, ड्रेनेज विभागाला पत्र देण्यात आली असून अंदाजपत्रकातही साडेतीन कोटींच्या खर्चाची तरतूद आहे. त्यानंतरही प्रशासनाकडून काहीच काम करण्यात येत नाही. त्यामुळे संभाव्य पूराचा धोका लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन केले जाणार आहे. तसेच पूरामुळे कोणाचा जीव गेल्यास अथवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार असेल.
– हरिदास चरवड, स्थानिक नगरसेवक