पुणे : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. नागरिक सुटकेचा श्वास घेत असतानाच आता स्वाईन फ्लू,निमोनिया, डेंग्यू यांची साथ शहरात जोरात चालू आहे. परंतु त्याबाबतची कोणतीही खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात नसल्याने शहरातील सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याची टिका कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे. तसेच संसर्गजन्य आजारावर लक्ष देणे,नागरिकांना त्याबाबत जागृती करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी नाही का? असा सवालही बागुल यांनी उपस्थित केला आहे.
बागुल म्हणाले की, शहरात स्वाईन फ्लू,निमोनिया, डेंग्यू यांची रुग्ण संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. त्या बाबत वेळीच उपाय योजना केल्यास शहरातील परिस्थिती आटोक्यात राहील. त्याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयात सूचना देऊन लक्ष ठेवण्यास सांगणे,जागृती करणे तसेच शहरातकिती आहे. त्याची सविस्तर आकडेवारी घेऊन प्रशासकीय बैठक घेऊन त्यावर उपाय योजना कराव्यात. ही साथ खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून शहरात त्याचा स्फोट होण्याअगोदर हालचाल करणे गरजेचे झाले आहे. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका सांगण्यात आला असून त्यासाठी देखील सज्ज राहावे लागणार आहे. परंतु सत्ताधारी निविदा काढण्यात गुंग व प्रशासन पूर्णतः गप्प असून नागरिकांना पुन्हा मृत्यूच्या खाईत जाण्यापासून रोखण्यासाठी देखील तयार राहणे गरजेचे आहे. अश्या परिस्थिती शहराकडे कोणाचे लक्ष आहे असा संतप्त सवाल आबा बागुल यांनी केला.