शांततेची बरकत देण्याचे एसपींचे आवाहन; शांतता कमिटीची बैठक संपन्न
सातारा, दि. 4 (प्रतिनिधी)
साताऱ्याची शांतता सर्वांनी प्रेरणा घ्यावी अशी आहे. शांततेचा हा अध्याय असाच पुढच्या पिढीत उतरवा, असे अवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले. मंगळवारी पार पडलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, अण्णासाहेब मांजरे, जोतीराम गुंजवटे यांच्यासह सातारा शहर, सातारा तालुका, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, शांतता कमिटीचे सदस्य तसेच हिंदू-मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शहरात शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही शांतता कमिटीच्या बैठकीत सर्वधर्मीयांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाल्या, सातारा शहर सर्व धर्मीयांच्यात समभाव असणारे शहर आहे. मला या शहराचा अनुभव खुप चांगला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत येथील जनतेने प्रशासनाला खुप चांगले सहकार्य केले आहे.
त्याचप्रमाणे यापुढील काळातही प्रशासनाला सहकार्य करावे. सातारकरांनी कोणत्याही समाजविघातक घटकांना थारा देऊ नये, तसेच साताऱ्याचा क्राईम रेट गेल्या काही दिवसात वाढलेला दिसत आहे. त्यामुळे किरकोळ वादावरून संघर्ष करणाऱ्या तरूणांच्या पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, सण उत्सवांच्या काळात समाज माध्यमांवरून अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, रमजान हा बरकतीचा महिना असल्याने सर्वांनी शांततेची बरकत आपल्याला शक्य तेवढी द्यायला हवी.
कोणाताही धर्म कधीच चुकीची शिकवण देत नसतो त्यामुळे सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सण असू अथवा नसू सातारकरांच्यात असलेला समतेचा गुण खऱ्या अर्थाने उल्लेखनीय असल्याचे सांगत त्यांनी साताऱ्यातील सर्वधर्मीयांच्यात असलेल्या एकीचे कौतुक केले.
अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील म्हणाले, समाजात असणाऱ्या डोम कावळ्यांपासून सावध राहा असे डोम कावळे स्वत:च्या स्वार्थासाठी कुठेही अन् कधीही विचारांची दरी निर्माण करू शकतात. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह शांतता कमिटी सदस्य, महिला व नागरिकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी सर्वधर्मीय नागरिकांसाठी पोलीस दलाकडून इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.