जुलै निम्मा संपला तरी खिसा रिकामा; कौटुंबिक कलह वाढला
सातारा, दि. 16, प्रशांत जाधव
“सदरक्षणाय खलनिग्रहनाय’ असे म्हणत जिल्ह्याच्या कायदा व सुव्यस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना आता आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. पोलीस मुख्यालयातील बाबूगिरीचा त्यांना चांगलाच फटका बसल्याने पोलीस दलातून बाबू संस्कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जुलै महिना अर्धा संपला तरी पोलिसांना जून महिन्याचा पगार मिळाला नसल्याने आता जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी लक्ष घालून दर महिन्याचा पगारात तरी पोलिसांच्या खिशात वेळेत अन् नियमित व्हावा, अशी मागणी होत आहे.
जिल्हा पोलिसांना काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, महिनाअखेरपर्यंत मिळणाऱ्या पगारासाठी आता 17 तारखेपर्यंत वाट पाहावी लागत आहे, तर गेल्या अनेक महिन्यांपासून अनियमित पगाराबरोबरच विविध बिलेही रखडली आहेत. या परिस्थितीत दर महिन्याच्या शेवटी घरातील आर्थिक ओढाताण पाहावी की सुरक्षा करावी, याची पोलिसांना चिंता लागली आहे.
यापूर्वीही सातारा पोलिस दलात अनियमित पगार होत होते. त्या वेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी परिस्थितीत सुधारणा करत महिना अखेरीस पोलिसांच्या खात्यात पगार जमा करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर काही महिन्यांपर्यंत पोलिसांना पगार बॅंकेत जमा झाल्याचा मेसेज वेळेत येत होता;
मात्र, मध्यंतरीच्या काळात ही व्यवस्था बिघडल्याचे बोलले जात आहे. पगारासाठी महिनाअखेरऐवजी पुढच्या महिन्याची 17 तर 18 तारीख उजाडत आहे. यासंदर्भात पोलिस दलातील नाराजी लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सातपुते यांनी वेळेवर पगार देण्यासाठी प्रयत्न करून तशा सूचना क्लेरिकल विभागाला दिल्या होत्या.
मात्र गेल्या दोन महिन्यात “कारकुनी’ कारभारामुळे त्यांचे प्रयत्न पूर्ण होत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पगाराला विलंब होत असल्याने घरभाडे, मुलांच्या शाळेची फी, दुधाचे बिल, किराणा, दैनंदिन खर्च, घराचे हप्ते आदी भागविताना पोलिसांना नाकीनऊ येत आहेत.
——————————————————————————————————-
पगारासोबत इतर बिलेही रखडली
पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना मेडिकल, विविध भत्ते, विकलेली रजा, राहिलेली रजा आदींचे पैसे मिळतात. त्याचा “बिले’ असा उल्लेख केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून बिलाची रक्कम थकलेली आहे. दरमहा बिले मंजूर होण्याची अपेक्षा असते; परंतु कारकुनी कारभारामुळे बिले रखडल्याची पोलिस कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.
बहुतेक कर्मचाऱ्यांचे पगार झालेत
मे महिन्याचा पगार हा सातव्या वेतन आयोगानुसार काढायचा असल्याने पगार उशीरा झाले होते. तर जून महिन्यात कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झाल्याने पगार होण्यास विलंब झाला असला तरी बहुतेक कर्मचाऱ्यांचे पगार झाले आहेत.
तेजस्वी सातपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा