सातारा – प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रकिया सुरु झाली असून संवर्ग एक व संवर्ग दोनमधील 1763 शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज केले होते. अर्ज पडताळणीत एक हजार 47 शिक्षक पात्र ठरले आहेत. ही बदली प्रक्रिया ऑनलाइन होणार असून अर्ज पडताळणीची गुरुवारी (दि. 24) अंतिम मुदत आहे. शिक्षकांमध्ये या बदल्यांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवरुन वादविवाद होत होते. ही प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शासनाने एका ऍपची निर्मिती केली. सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे आणि एका शाळेत पाच वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते.
नव्या प्रक्रियेनुसार बदलीपात्र शिक्षकांना 50 शाळांचा पसंतीक्रम देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुगम आणि दुर्गम शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच घोषित केली होती. त्यानुसार बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असून बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या दि. 25 नोव्हेंबरला सादर होणार आहेत. त्यानंतर काही तक्रार असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील करण्यास मुदत दिली जाणार आहे.
ही बदली प्रक्रिया टप्याटप्याने राबविण्यात येणार असून दि. 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली. बदली प्रक्रियेत पहिल्या टप्यात जिल्ह्याबाहेरील शिक्षकांच्या जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत. दुसऱ्या टप्यात जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये आपसी, विनंती आणि प्रशासकीय बदल्या पहिल्यांदाच ऑनलाइन पध्दतीने होत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत शिक्षकांनी भरलेल्या माहितीत किती पारदर्शकता आहे हे सुध्दा सर्वांना पाहता येत आहे. बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न होत आहेत.
बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात
प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या पहिल्यांदाच होत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार आहे. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत प्रक्रियेबाबत मात्र शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या शक्यतेने बदली प्रक्रिया रखडण्याची शंका शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. मात्र, शिक्षकांची बदली प्रक्रिया अंतिम टप्यात आली असून वेळापत्रकाप्रमाणे बदल्या होणार असल्याचे जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे. वेळापत्रकाप्रमाणे बदल्या होणार असल्याने अनेक शिक्षकांची डोकेदुखी वाढणार आहे.