सातारा – दरवर्षी मराठी नववर्षाचा प्रारंभ गुढीपाडवा सण साजरा करून होतो. गुढीपाडव्याला घरोघरी उभारण्यात येणाऱ्या गुढीला साखरेची गाठी हवीच असते. ही साखरगाठी बनवण्याची सध्या धांदल सातारा येथील भरतशेठ राऊत यांच्या मिठाई कारखान्यात जोरात सुरू आहे. यावर्षी देखील त्यांच्या साखरगाठी अमेरिका व दुबईला जाणार आहेत. यासाठी अहमदनगर परिसरातून हे कसबी कारागीर दिवस रात्र मेहनत घेऊन पांढऱ्या, केशरी, पिवळ्या आणि भगव्या रंगाच्या आकर्षक साखरगाठी तयार करण्यात मग्न आहेत.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे सणांवर औदिसिन्य होते. मात्र मागील वर्षीपासून गुढीपाडवा उत्साहात साजरा होत असून यासाठी लागणारी साखरगाठी सातारा शहरात बनवण्याचा हा मोठा कारखाना आहे. याच कारखान्यातून लगतच्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यातही साखरगाठीची होलसेल विक्री केली जात असते. अनेक मिठाई विक्रेते ही गाठी खरेदी करण्यासाठी अगोदरच आगाऊ नोंदणी करून साखरगाठी खरेदी करतात.
दरवर्षीप्रमाणे भरतशेठ राऊत यांच्या मिठाई दुकानातून याही वर्षी अमेरिका, दुबई, युरोप ,न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथील पाहुण्यांसाठी या गाठ्या भारतीय नागरिकांनी आकर्षकपणे पॅक करून त्या रवाना केल्याची माहिती राऊत परिवाराचे सतीश राऊत यांनी दिली. या गाठी कारखान्यांमध्ये दरवर्षी महाकाय साखरी गाठ्याही बनवल्या जातात. अकरा पदकांची ही भव्यगाठी पुणे येथील दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर तसेच दगडूशेठ गणपती, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वाई येथील ढोल्या गणपती, औंध येथील श्री यमाई देवी, कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिरामध्ये भेट स्वरूपात दरवर्षी नेऊन देण्याची प्रथा अखंडपणे सुरू आहे.
पंधरा रुपयापासून अगदी 700 रुपये नगापर्यंतची ही साखरगाठी मोठ्या आवडीने खरेदी करून गुढीला उभारली जाते. अनेक देवालयात देवांना ही गाठी घातली जाते. मागील वर्षी मर्यादित स्वरूपात साखरगाठी बनवली गेल्यामुळे शेवट शेवट ही गाठी मिळेनाशी झाल्यामुळे दरही चढ्या भावाने झाले. अनेक विक्रेत्यांनी भरपूर नफा या साखरगाठीच्या विक्रीतून कमावल्याची माहितीही शेखर राऊत यांनी यावेळी दिली. राऊत परिवाराचे प्रमुख भरतशेठ राऊत यांच्या सुनियोजनामुळे तसेच ना नफा, ना तोटा तत्वावर ही साखरगाठी बनवून विक्री करण्याचा व्यवसाय दरवर्षी वाढतच आहे. दरवर्षीप्रमाणे परदेशी पाहुण्यांसाठी ही साखरी गाठी परदेशात गेल्याचा मोठा आनंद होत असल्याचे भरतशेठ राऊत यांनी सांगितले.