ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फटकारले
कोलकाता : सुधारीत नागरिकत्व कायदा (का) संसदेत सखोल चर्चा न घडवताच मंजूर केला. त्यामुळे का आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) राज्यात लागू करू देणार नाही या इशाऱ्याचा पुनरूच्चार प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. समाज कंटकांच्या वेशावरून त्यांच्यात फरक करता येणार नाही, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिले.
जाधवपूर येथे का आणि एनआरसीच्या विरोधातीळ मेळाव्यात बॅनर्जी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, बंगालमध्ये का नाही आणि एनओसी नाही हीच आपली घोषणा आहे. झारखंड येथे प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांच्या वेशभुषेवरून ते कोण आहेत ते समजते, अशी टीका केली. त्याला उत्तर देताना बॅनर्जी म्हणाल्या, वेशभुषेवरून समजाकंटकांत फरक करता येणार नाही.
जामिया मिलियामध्ये पोलिसांनी केलेल्या विद्यार्थ्यांच्या छळाचा निषेध त्यांनी केला. त्या म्हणाल्या, विद्यापीठात पोलिसांनी अशी गुंडगिरी करणे अयोग्य आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती होती. भाजपा देशात हिंसाचार घडवायला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करून त्या म्हणाल्या, भाजपा कटकारस्थाने थांबण्याचे नावच घेत नाहीत. ते आगच अशीच लावतात. आम्ही हिंसाचार कधीही सुरू करत नाही.
बंगालमध्ये हिंसाचाराच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. संसदेत असलेल्या बहुमताच्या जोरावर भाजपा हा कायदा राज्यात लादू शकणार नाही. एक दोन घटना घडताच केंद्र सरकारने राज्यातील रेल्वे सेवा बंद केली आहे. ती पुन्हा चालु करावी अशी मागणी त्यांनी केली.