नवी दिल्ली : सध्याचा 4.5 टक्के विकास दर अस्वीकारार्ह आणि चिंताजनक आहे, असे परखड प्रतिपादन अर्थतज्ञ असणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले आहे. एवढेच नव्हे तर, संशयाचे वातावरण दूर करून समाजात परस्परविश्वासाचे वातावरण निर्माण करा. त्यामुळे अर्थव्यवस्थेला उभारी येण्यास हातभार लागेल, असा अनुभवी सल्लाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.
अर्थव्यवस्थेवर आधारित एका परिषदेत मनमोहन बोलत होते. सध्या समाजात अविश्वासाचं, भीतीचं आणि निराशेचे वातावरण आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम आर्थिक घडामोडींवर आणि आर्थिक वाढीवर होत आहे. देशाचा विकास दर वर्षाला 8 ते 9 टक्के इतका असायला हवा, अशी गरज त्यांनी व्यक्त केली.
त्यांनी सध्या सुरू असलेल्या अर्थव्यवस्थेच्या घसरणीसाठी मोदी सरकारला जबाबदार धरले. प्रत्येक उद्योगपती, बॅंकर, नागरिकावर संशय घेण्याचे धोरण सरकारने अवलंबलेले दिसते. त्यामुळे आर्थिक विकास रोखला गेला आहे. मागील सरकारांनी प्रत्येक धोरण चुकीच्या हेतूने बनवले, असा अविश्वास दाखवला जात आहे, असे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केवळ आर्थिक धोरणात बदल करण्याने काही होणार नाही. भीती घालवून समाजात विश्वास निर्माण करणेही गरजेचे आहे, असे मनमोहन यांनी नमूद केले.