वाडा येथील कोपरा सभेत खासदार आढळराव यांची कॉंग्रेस, राष्ट्रवादीवर जोरदार घणाघात
राजगुरूनगर – कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सत्तेवर येण्याची इतकी घाई झाली आहे की, त्यासाठी ते काश्मीरचाही बळी द्यायला निघाले आहेत. म्हणूनच काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधानपद निर्माण करण्याचे आश्वासन कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. मग देशाचे तुकडे करायला निघालेल्या कॉंग्रेसच्या हाती देशाचे नेतृत्त्व द्यायचे का? याचा विचार तुम्हाला करायचा आहे, असे विधान शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना तथा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
आपल्या प्रचारार्थ खासदार आढळराव यांनी शनिवारी (दि. 20) खेड तालुक्याचा दौरा केला. त्यावेळी वाडा येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. या दौऱ्यात जिल्हाप्रमुख राम गावडे, दिलीप मेदगे, विजया शिंदे, शिवाजी वर्पे, अशोक खांडेभराड, जिल्हा दूध संघाचे संचालक चंद्रशेखर शेटे, भाजपचे तालुकाध्यक्ष व जि. प. सदस्य अतुल देशमुख, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शिंदे, जि.प.सदस्या तनुजा घनवट, ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेटे, भापती भगवान पोखरकर, संजय घनवट, रामदास धनवटे, गणेश सांडभोर, शिवाजी मांदळे, नंदा कड, संतोष डोळस, राजेंद्र गायकवाड, कैलास गोपाळे आदी सहभागी झाले होते.
आढळराव म्हणाले की, ज्यांनी भ्रष्टाचाराशिवाय त्यांनी दुसरे काहीच केले नाही ते मला 15 वर्षांत काय केले असे विचारतात. तर मग 50-60 वर्षे सत्तेत्त राहून तुम्ही काय केले ते तरी सांगा? याचे उत्तर आधी जनतेला द्या. त्यानंतरच मी काय केले हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होतो. मी जे केले ते माझ्या कार्यअहवालामध्ये फोटोसह छापले आहे. माझ्याइतकी कामे केलेला तुमचा एक तरी खासदार दाखवा असे आव्हान खासदार आढळराव पाटील यांनी विरोधकांना दिले. सध्याचा दुष्काळ निसर्गनिर्मित नसून तर राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराचे पाप असल्याचे त्यांनी नमूद केले.
- डॉ. अमोल कोल्हे माझा पाहुणा आहे, तरीही मी त्याच्या विरोधात आहे, यावरुन इतरांनी बोध घ्यावा. जातीपातीच्या राजकारणाला व प्रचाराला बळी न पडता खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच मतदान करा.
– सुरेश गोरे, आमदार, खेड तालुका