इंदौर – देशभरात करोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या जशी वाढत आहे, तसाच मृतांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. माध्यमांमध्ये देखील चिंता वाढविणाऱ्या बातम्या सतत येत आहे. मात्र आता सकारात्मक आणि दिलासा देणार बातमी आली असून 97 वर्षीय आजींनी करोनावर मात केली आहे.
इंदूरमधील 97 वर्षीय शांतीबाई दुबे या करोनाला हरवून घरी परतल्या आहेत. शांतीबाई यांच्या फुफ्फुसांमध्ये जवळजवळ 80 टक्क्यांपर्यंत संसर्ग पोहोचला होता, तरीही डॉक्टरांनी आणि स्वतः शांतीबाईंनीही हार मानली नाही. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि चांगले उपचार यांच्या जोरावर त्या रामनवमीच्या दिवशी पूर्ण बऱ्या होऊन घरी पोहोचल्या.
शांतीबाई यांनी वाढदिवसाच्या दिवशीच करोनाला हरवून घर गाठलं आहे. शांतीबाई यांचा जन्म 1925 मध्ये रामनवमी दिवशी झाला होता, आपल्या जन्मदिवशी नवीन जीवन मिळवून त्या ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. करोना संसर्ग झाल्यामुळे त्यांना 8 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये 80 टक्क्यांपर्यंत संसर्ग पोहोचला होता. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन लावण्याचा गरज पडली होती. मात्र डॉक्टरांचे अथक परिश्रम आणि शांतीबाई यांची दुर्दम्य इच्छा शक्ती यामुळे करोनावर मात करण्यात यश आलं.