बुलढाणा येथे घडली होती घटना
बुलढाणा : बुलढाणा शहरापासून काही अंतरावर असलेल्या गिरडा जंगलात 6 सप्टेंबर रोजी 90 श्वान मृतावस्थेत सापडले होते. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथून 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान त्यांनी या श्वानांचे पाय बांधून गिरडा जंगलात आणून टाकले असल्याचे कबूल केले आहे.
भोकरदन येथील नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या आदेशावरुन शहरातील श्वान पकडण्याची मोहीम राबवण्यात आली होती. शहरातील शेकडो श्वान पकडल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर या श्वानांचे पाय बांधून नगरपरिषदेच्या 5 स्वछता वाहनातून गिरडा येथील जंगलात आणून टाकण्यात आले होते, अशी माहिती आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी भोकरदन नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
श्वान मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेत बुलढाणा पोलिसांनी तपास सुरु केला होता. भोकरदन येथील सिद्धेश्वर नारायण गायकवाड, अनिल वसंत गायकवाड, संतोष सीताराम शिंदे, शेख सलीम शेख शोकात आणि विष्णू उर्फ बाबासाहेब सूर्यभान गायकवाड या 5 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनकडून सुरु आहे.