विधानसभेच्या मतदानांवर बहिष्कार
निमसाखर- शेती महामंडळाच्या कामगारांना प्रत्येकी पाच एकर जमीन मिळावी, सहावा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्या सरकारने दि. 30 ऑगस्टपर्यंत मान्य करावे; अन्यथा विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या इशारा कामगारांनी दिला आहे. न्याय मागण्या न्यायालयीन निर्णय, विविध बैठका व मोर्चे काढूनही मान्य होत नसल्याने शेती महामंडळाचे कामगार आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार लढा कृती समीतीने कामगारांच्या विविध मागण्या मान्य होत नसल्याने हा मार्ग स्वीकारला आहे.
सेवानिवृत्त व रोजंदारी कामगार, कामावर असलेले व मयत कामगारांचे वारसदार यांना दोन गुंठे जागा देऊन पंतप्रधान घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुल बांधून मिळणे, 2008-09 ते 2012-13 या पाच वर्षांचा 8.33 टक्के दराने रोजंदार कामगारांना बोनस मिळावा, 1986 पासून चौथा तर 1996 पासून पाचव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा, 2003 च्या कराराप्रमाणे व सहायक कामगार आयुक्तांच्या निर्णयाप्रमाणे सेवाउपादन मिळावे, औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे रोजंदारी कामगारांना समान कामास समान वेतन मिळावे, कामगारांना पाच एकर जमीन मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी लढा देऊनही मागण्या मान्य होत नसल्याने विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला आहे. जर 30 ऑगस्ट रोजी सरकारने योग्य निर्णय घेतल्यास बहिष्काराचा निर्णय मागे घेण्यात येईल, असे बैठकीत ठरले आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ लढा कृती समितीचे अध्यक्ष आनंदराव वायकर, उपाध्यक्ष अविनाश आपटे,भिकेन शिंदे, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी, कायदेशीर सल्लागार मिररोशन मुलाणी यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले आहे.