खरीप हंगामाकरिता कृषि अधिकाऱ्यांचा सल्ला; मॉन्सून वाटचाल वेळेत, दमदार पावसाची गरज
प्रमोद ठोंबरे
बारामती- जिह्यात मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला पावसाची तुरळक हजेरी लागली असली तरी वरूणराजाचे वेळेत (दि. 7 जून) आगमन झाले आहे. पाऊसमानाची वाटचाल कायम राहणार असून मंगळवार (दि.11) मुंबईसह कोकणात व दक्षिण महाराष्ट्राच्या भागात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. तर, बुधवार (दि. 12), गुरूवारी दक्षिणेकडून उत्तर दिशेने पावसाची वाटचाल असेल. या आठवड्यात पुणे जिल्ह्यात मॉन्सूनचे सर्वत्र आगमन होण्याची दाट शक्यता असून जमिनीत 65 मिलीमीटर ओलावा झाल्यानंतर पेरणी सुरू करावी, धूळ वाफ पेरणी टाळावी. अन्यथा, पावसात मोठी उघडीप झाल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येते. तसेच कोरडवाहू भागात उताराला आडवे सारे पाडावेत, त्यामुळे जल व मृदसंधारण होईल. शेतकऱ्यांनी शक्यतो कडधान्याच्या पेरण्या प्रथम कराव्यात. कमी कालावधीची व कमी पाणी लागणारी पिके व त्यांच्या कमी कालावधीच्या जातींची पेरणी करावी, असा सल्ला विभागीय कृषि अधिकारी बालाजी तोटे यांनी दिला आहे.
जिल्ह्यात बारामती, इंदापुर वगळात सर्वत्र पाऊस झाला असला तरी त्याचे प्रमाण नांगरणी इतपतही नसल्याने खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीला आणखी एखादं दुसऱ्या पावसाची गरज आहे. शेतकऱ्यांनी शेतकामांना सुरूवात केली असली तरी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषि अधिकारी ताटे यांनी दिला आहे. खरीपाच्या तयारी असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीनंतर योग्य प्रमाणात पाऊस झाला नाही तर पेरण्या वाया जावून त्यातून मोठे आर्थिक नुकसान होते, याची जाणीवच ठेवून पेरणीची कामे हाती घ्यावीत, याकरिता कृषि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही सांगण्यात आले.
जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी साधारणत: 2 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्रावर होईल, अशी अपेक्षा आहे. परंतु, मृगातील पहिल्याच पावसाने केवळ निम्याच भागात हजेरी लावल्याने पश्चिमेकडील भागातील शेतकरी खरीपाची तयारी सुरू करणार नाहीत. दि. 7 जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले असुन या नक्षत्रात पावसाचे प्रमाण चांगले राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच वेळेत पाऊस झाला आहे. यामुळे पहिला पाऊस झालेल्या भागातील शेतकरी खरीपाच्या पूर्व मशागतीची तयारी सुरू करतील. पाऊसमानाचा वर्तविण्यात आलेल्या अंदाजनुसार ज्वारी, बाजरी या पीकांची खरीपात पेरणी होईल, त्यातही शेतकऱ्यांनी तृणधान्य पेरणीवर अधिक प्राधान्य द्यावे, असे कृषि विभागाकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, शुक्रवारी (दि.7) पावसाचे आगमन झाल्याने वेळेत आला तसा… पाठ फिरवू नको, अशी आळवं शेतकरी वरूणराजाला घालीत आहे. राज्यात मोसमी पावसाचे आगमन वेळेत होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तो खरा ठरत पावसाच्या सरी सर्वत्र कोसळल्या आहेत. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पावसाने वेळेत हजेरी लावली आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात वळिवाचा पहिलाच पाऊस दमदार झाला आहे. तर, दौंड, पुरंदरमध्ये अत्यल्प प्रमाण राहिले. बारामती, इंदापुरात पाऊस झालाच नसल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.
- भात पट्ट्यात तयारी सुरू…
जिल्ह्याचा भात पट्टा असलेल्या पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत प्रामुख्याने भाताची लागवड केली जाते. चांगल्या पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे. याकरिता लागणाऱ्या निविष्ठांचा पुरवठा कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांना सुरू झाला आहे. आत्मा व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठी लागणारी रोपवाटिका यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही ठिकाणी रोपवाटिकेत भात बियाणे टाकण्याची कामे सुरू झाली आहेत. जिल्ह्यात भाताची सुमारे 62 हजार 500 हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. यानुसार आतापर्यंत चार हजार 991 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.