अजित पवारांच्या दौऱ्यानंतर इच्छुकांची घालमेल ः गळती रोखण्याचेही आव्हान
श्रीकृष्ण पादिर
पुणे-शिरूर -हवेलीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम आहे. “जायचे त्याला जाऊद्या आमच्याकडे अन्य चेहरे आहेत’, असे विधान राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवस्वराज्य यात्रेनिमित्त शिरूर शहरात आले असताना केले. त्यांच्या या विधानानंतर कोणाची उमेदवारी कन्फर्म नाही हे नक्की झाले आहे. यामुळेच इच्छुक उमेदवारांमधील घालमेल वाढली असून, पुढील काळात नाराज बंडोबा कोणता झेंडा हाती घेणार की, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
राष्ट्रवादीची ताकद असतानाही शिरूर-हवेलीत सध्याचे आमदार भाजपचे आहेत. राज्यासह केंद्रातही भाजप-सेनेची सत्ता आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी तसेच इतर पक्षांमधून सेना-भाजपमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणावर होत असताना शिरूर तालुकाही यामध्ये मागे राहिला नाही. गेल्याच आठवड्यात तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट मातोश्री गाठत मनगटावरील घड्याळ काढत शिवबंधन बांधले. काही जणांनी कमळाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे पक्षाला लागलेली ही गळती रोखतानाच बंडखोरांनाही शांत करण्याचे आव्हान राष्ट्रवादीपुढे पेलावे लागेल. मात्र कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही, हे पक्षश्रेष्ठींनी ठरवलेले दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत तगड्या उमेदवाराला नवखा चेहरा पराभूत करू शकतो, हे अजित पवार वारंवार अनेक सभांमध्ये सांगत आहेत. त्यातून कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळत आहे.
- अशोक पवार –
शिरूर-हवेलीचे माजी आमदार राहिलेले ऍड. अशोक पवार हे उच्चशिक्षित उमेदवार असून कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. घोडगंगा कारखान्याच्या माध्यमातून त्यांची नाळ शेतकऱ्यांशीही जुळलेली आहे. आमदारकीच्या काळात त्यांनी अधिकाधिक निधी आणण्यात यश मिळवले. त्यांच्या काळात उल्लेखनीय कामेदेखील झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात चांगली कामगिरी राहिली होती. लोकसभा निवडणुकीतही तालुक्यातून राष्ट्रवादीला आघाडी मिळाली. असे असले तरी केवळ कार्यकर्त्यांशी चांगले संबंध असून चालत नाहीत तर, पदाधिकाऱ्यांनाही सांभाळावे लागते. किंबहुना याचाच फटका अशोक पवार यांना मागील निवडणुकीत बसला अन् पराभव पत्करावा लागला. - प्रदीप कंद –
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविताना इंदापूरचे दत्तात्रय भरणे यांनी आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त प्राधान्य देत आमदारकी मिळवली. तोच फॉम्युला माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी वापरला आहे. मात्र त्यांना येथे पक्षातूनच प्रतिस्पर्धी आहेत. विकासकामांच्या बाबतीत कंदही कोठे कमी पडले नाहीत. 2014मध्येही ते इच्छुक होते; मात्र पक्षश्रेष्ठींनी विद्यमान आमदारांना उमेदवारी देत त्यावेळी शांत केले होते. तेव्हाच पुढीलवेळी नक्की विचार केला जाईल, असाही शब्द दिल्याचे सांगण्यात येते. त्यादृष्टीने मतदारसंघात त्यांनी प्रचंड जनसंपर्क वाढवला आहे. हवेलीला प्रतिनिधीत्त्व मिळावे असाही सूर निघत असल्याने ऐनवेळी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. - मंगलदास बांदल-
धडाडती तोफ अशी यांची जिल्ह्यात ओळख आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांदल यांनीही मतदारसंघात विकासाला प्राधान्य दिले आहे. विशेषतः तरूण वर्गामध्ये त्यांची क्रेझ आहे. खासदारकीलाही ते इच्छुक होते. मात्र त्यावेळी प्रदेशपातळीवरील पद देऊन त्यांना शांत करण्यात आले. यावेळी त्यांनी आंबेगाव-शिरूर अथवा शिरूर-हवेली या दोन्ही मतदारसंघावर दावा केला आहे. आंबेगाव-शिरूरमधून दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याने शिरूर-हवेलीचाच पर्याय त्यांच्यापुढे आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचारसभांमधून त्यांनी सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यात यश मिळवले. शिवाय याअगोदर विधानसभा निवडणुकीचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे. आता पक्षश्रेष्ठी आपले मत कोणाच्या पारड्यात टाकतात, एवढाच प्रश्न बाकी आहे.