आज आंदोलन : बंधारा पूर्ण क्षमतेने भरा
शिरुर- शिरुर शहराला पाणीपुरवठा होत असणाऱ्या घोडनदीवरील बंधारा (दि. 20) पर्यंत पूर्ण क्षमतेने भरून द्यावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते हे शुक्रवार (दि.17) रोजी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती लोकशाही क्रांती आघाडीचे सचिव अनिल बांडे यांनी दिली आहे. दरम्यान, शहरात पाणीटंचाईचे पडसाद उमटले आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकारी पुणे व तहसीलदार शिरुर यांना लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, नगरसेवक मंगेश खांडरे, लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश सतीजा, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, लोकशाही क्रांती आघाडीचे महंमद पटेल, जनता दलाचे अध्यक्ष संजय बारवकर, संजय बांडे आदीनी निवेदन दिले आहे.
यासंदर्भात निवेदनात म्हटले आहे की, शिरुर शहराची लोकसंख्या 50 हजारांपेक्षा जास्त असून दररोज शिरुर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांतून आठ ते दहा हजारांहून जास्त लोक शिरुरमध्ये येत असतात. गेल्या काही दिवसांपासून शहराला पाणीटंचाई जाणवत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी घोडनदीवरील बंधारा हा एकमेव असून हा बंधारा 20 पर्यंत पूर्ण क्षमतेने भरून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हा बंधारा भरण्यासाठी 150 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यासंदर्भात निर्णय होऊन सुध्दा इतर ठिकाणच्या राजकीय दबावामुळे शिरुर शहराला देण्यात येणाऱ्या पाण्याचा वेग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे घोडनदीवरील बंधारा पूर्ण क्षमतेने भरता येणार नाही. त्यामुळे पुढील काळात शहरातील 50 हजारांहून अधिक लोकसंख्येला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.
शिरूर नगर परिषद बंधाऱ्यामध्ये कुकडी कालव्याच्या 61 किमी वितरकेमधून 150 क्युसेकने विसर्ग सुरू केले गेले. परंतु 2 दिवसांपासून पारनेर तालुक्यातील विसापूर डॅममध्ये पाणी सोडण्यात आल्यामुळे शिरूर बंधाऱ्यात 60 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. शिरूर नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती विठ्ठल पवार, किरण बनकर यांनी वस्तुस्थितीची कल्पना आमदार बाबुराव पाचर्णे यांना दिली. त्यांनी ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन 150 क्युसेकने पाणी सोडण्यास सांगितले. जोपर्यंत शिरूर नगर परिषदेचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरत नाही. तोपर्यंत शिरूर नगर परिषदेचे कर्मचारी कुकडी कालव्याच्या 61 किमी वितरिकेवरून उठणार नाही, असे पाणीपुरवठा सभापती विठ्ठल पवार यांनी सांगितले.