उरुळी कांचन- पुणे जिल्ह्यात अनेक दिव्यांग शाळा आहेत. शहर, ग्रामीण तसेच आदिवासी भागात असल्याने प्रत्येक शाळेला वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यात मतभेद होऊ नयेत. दिव्यांगाचा विकास व्हावा, त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने पुणे येथील समाजकल्याण विभागाला विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, समाजकल्याण अंपग विभाग अधिकारी रोहिणी मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक भारती संघटनेच्यावतीने पुढील मागण्या करण्यात आल्या. पगार वेळेत तसेच पगाराची स्लीप वेळे द्यावी, खर्चाची सर्व बिले त्वरित काढली जावीत, शाळा संहितेप्रमाणे कामाचे तास व सुट्या लागू कराव्यात, अपंग शाळेतील कर्मचाऱ्यांना दुय्यम सेवा पुस्तके देण्यात यावीत, नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांची डीसिपीएस खाती उघडण्यात यावीत, सुट्यांचे परिपत्रक वेळेवर काढावे, पेंशन प्रस्ताव सहा महिने अगोदर पाठवावेत, शाळा सुटल्यानंतर शिक्षकांना विनाकारण थांबवू नये, अपंग मुलांसाठी क्रीडा धोरण ठरवण्यात यावे. या वेळी शिक्षक भारती संघटनेचे अशोक जाधव, कैलास गायकवाड, अशोक नांगरे, रविंद्र जोशी, सोमनाथ शिंदे, रंगनाथ गजरे, गणेश टिळेकर, प्रशांत गडदे, संतोष पठारे, रामचंद्र चौधरी यांच्यासह महिला शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.