पुणे – जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेत विलंब झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शिक्षकांना बदलीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत. ज्या जिल्हा परिषदेकडून कार्यवाही होणार नाही, त्यांनी प्रत्यक्ष भेटून खुलासा करावा असे सांगितल्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आज पुणे जिल्हा परिषदेमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे पहायला मिळाले.
“जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया 2019′ अंतर्गत बदलीप्राप्त शिक्षकांच्या याद्या घोषित करणे, शाळानिहाय रिक्त जागा आणि समानीकरणासाठी ठेवायची अनिवार्य रिक्त पदांची शाळानिहाय यादी, घोषित करून सर्व माहिती ऑनलाइन टाकून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिंनमध्ये पडताळणी आणि प्रमाणित करावी. त्यानंतर संवर्ग 1 ते 4 साठी बदलीचे अर्ज भरण्याची सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून देण्यात आले होते. मात्र कोकण विभागातील जि.प. वगळता अन्य जि.प.ने या संदर्भात कार्यवाही केली. त्यात पुण्याच्या जि.प.समावेश आहे.