नगर -मानवी जीवनामध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे मानवी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छता अभियान सुरु करुन, देशाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल होत असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपाच्यावतीने सेवासप्ताहाचे आयोजन करुन सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. यामध्ये रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, फळ वाटप तसेच दिव्यांगांना मदत असे उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले, असे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हा प्रभारी मनोज पांगारकर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत शहर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गाडगीळ पटांगण येते स्वच्छता अभियानत राबविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या अभियानात महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, अँड. विवेक नाईक, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, मध्यमंडलाध्यक्ष अजय चितळे, नगरसेविका सोनाली चितळे, अजय ढोणे, सूरज शेळके, दीपक गांधी, पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते. महापौर वाकळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छता अभियान सुरु करून समाजाला एक स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम केले आहे.
अहमदनगर महानगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये भाग घेऊन स्वच्छतेच्या माध्यमातून 3 स्टार मानांकन मिळवून देण्याचे काम सर्व नगरकरांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.
या मानांकनामुळे नगरचे नाव देशपातळीवर घेतले गेले. स्वच्छतेतून निरोगी आरोग्याकडे वाटचाल करण्याचे काम आम्ही केले. नगर शहर कचराकुंडी मुक्त करण्याचे काम केले असल्याचे ते म्हणाले.