संतोष पवार
सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ढाण्या वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीची घोषणा रविवारी झाल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभवाचा सामना करावा लागलेले शशिकांत शिंदे पुन्हा आमदार होणार असल्याने राष्ट्रवादीचा सिंह पुन्हा आल्याची भावना व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्ष बळकट करण्यात शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद भूषवताना त्यांनी पक्षाला बळकटी दिली. मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात विकासकामे करून जनतेशी नाळ जोडली. सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राष्ट्रवादीमध्ये शिंदे यांचे वेगळे स्थान आहे; परंतु विधानसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघात त्यांचा शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी पराभव केला. शशिकांत शिंदे थोड्या मतांनी पराभूत झाल्याने राष्ट्रवादीचा गड आला, पण सिंह गेला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती. या पराभवाने खचून न जाता शशिकांत शिंदे यांनी पक्ष बळकटीचे काम सुरू ठेवले.
पूर्वीपासूनचा जनता दरबार सुरू ठेवून त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली. पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रदेश उपाध्यक्षपद देऊन नवी मुंबई विभागाची संपूर्ण जबाबदारी सोपवली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना आमदार फुटू नयेत यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कोणी विसरू शकणार नाही. जे आमदार अन्य पक्षांच्या गळाला लागतील, अशी भीती होती, त्या आमदारांना परत आणण्याचे धाडस शिंदे यांनी केले. त्यामुळे शरद पवार यांनी या लढवय्या कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेवर शिंदे यांची वर्णी लागेल, अशी शक्यता होती; परंतु ती शक्यताच ठरली.गेल्या महिनाभरापासून विधान परिषद निवडणुकीची चर्चा होती. राष्ट्रवादीला दोन जागा मिळणार असल्याने शशिकांत शिंदे यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. ही शक्यता खरी ठरली असून रविवारी शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या उमेदवारीची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. शिंदे यांच्या उमेदवारीने सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी ही निवड फायदेशीर ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला शिंदे. शिंदे यांचा कोरेगाव मतदारसंघ व “होम पिच’ जावळी तालुक्यातही आनंद व्यक्त होत आहे.
एका दगडात दोन पक्षी
जिल्ह्यात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपने रणनीती आखली. त्यानुसार माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाले. सातारा-जावळी मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले व माण-खटावमध्ये जयकुमार गोरे हे दिग्गज आमदार भाजपला मिळाले. त्यानंतर उदयनराजे भोसले यांना भाजपने राज्यसभेची खासदारकी दिल्याने जिल्ह्यात भाजप वाढण्याची शक्यता आहे. भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपद दिले, तरी त्यांचा फारसा प्रभाव पडताना दिसत नाही. आता शिंदे यांच्यामुळे धडाकेबाज, आक्रमक आमदार मिळणार आहे. शिंदे यांना उमेदवारी देऊन भाजपचा वाढता प्रभाव रोखण्याची जबाबदारीही सोपवली जाणार आहे. त्यामुळे शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.