मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धोका आहे, एकनाथ शिंदे बंड करु शकतात याची तब्बल चार वेळा माहिती ही स्वत: शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. गृहखात्याकडून चार ते पाच वेळा माहिती देऊनदेखील उद्धव ठाकरेंकडून कोणतेही पाउले उचलली न गेल्याने सरकारचा घात झाल असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे बंड करु शकतात अशी माहिती चार वेळा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून सहा वेळा पक्षात बंडखोरी होणार असल्याची माहिती दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती आता समोर आली आहे. पण त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे राज्यातील सरकार पडले.
तसेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचाही सरकारला फटका बसला आहे. यात आघाडी सरकारने विधीमंडळाचे अध्यक्षपद हे रिक्त ठेवले. हे पद खूप महत्त्वाचे असते, अगदी राज्यपालांच्या बरोबरीचे. याचा फायदा घेत बंडखोरांनी उपाध्यक्षांवरच अविश्वास व्यक्त करून अपात्रतेची कारवाई टाळली.
याशिवाय बंडखोर आमदारांवर थेट कारवाई न करणे हे शिवसेनेच्या अंगलट आले. 21 जूनला जेव्हा सकाळी हे स्पष्ट झाले की सेनेचे 25-30 आमदार सुरतला गेलेत त्याचवेळी एकही मिनिट न गमावता शिवसेनेने त्यांना आदल्या रात्री विधानपरिषद मतदानात क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय व्यक्त करून आणि पक्षविरोधी कारवाई म्हणून अपात्र करण्याची प्रक्रिया लगेच सुरू करायला पाहिजे होती. मात्र, तिन्ही पक्ष गाफील राहिल्याने बंडखोर वाढत गेले आणि आकडा 37च्याही पलीकडे गेला जी आता सेनेसाठी मोठी कायदेशीर अडचण ठरली.