पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सुरूवातीला 1 ते 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये “व्यर्थ न हो बलिदान’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ येत्या 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी व लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त “केसरीवाडा’ येथे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने हा उपक्रम होणार आहे.
प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यकमात स्वातंत्र्य सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येणार असून, त्यामध्ये वसंतराव जोशी, श्रीमती उषा दामोदर देसाई हे स्वातंत्र्य सैनिक व लोकमान्य टिळक यांचे वंशज डॉ. दीपक टिळक, काकासाहेब गाडगीळ यांचे वंशज अनंत गाडगीळ, केशवराव जेधे यांचे वंशज संताजी जेधे, शंकरराव मोरे यांचे वंशज दीपक मोरे, शिवराम राजगुरू यांचे वंशज सत्यशिल राजगुरू, बाबू गेनू यांचे वंशज किसन सैद, ना. सी. फडके यांचे वंशज विजय फडके, नारायण दाभाडे यांचे वंशज धनंजय दाभाडे, लिलाताई मर्चंट यांचे पुत्र सुहास मर्चंट यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे शहर कॉंग्रेसचे प्रवक्ते रमेश अय्यर यांनी कळवले आहे.