नदीपत्रात साडेचार हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू
नीरा- वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण 94 टक्के भरले आहे. रविवारी (दि. 28) दुपारी साडेचार वाजल्यापासून नीरा नदीपात्रात 4458 वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशाराही दिला आहे.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचा एक दरवाजा दोन फुटाने उचलून 4458 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तसेच पुढे सोलापूर जिल्ह्याला वरदायी असलेल्या नीरा नदीत पाणी सोडल्याने नदीकाठच्या लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.
भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आज सकाळपर्यंत एकूण 538 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर कालपासून आज सकाळपर्यंत 68 मिमी इतका पाऊस झाला असून धरण 89 टक्के भरले आहे. तर नीरा देवघर धरणात आजअखेर 61 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारपासून रविवार सकाळपर्यंत 95 मिमी पाऊस झाला. तर आज अखेर एकूण 1333 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर वीर धरणात 94 टक्के पाणीसाठा झाला आहे. वीर धरणाच्या आसपासच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी 5 मिमी पाऊस झाला, अशी माहिती सहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी दिली आहे.