खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
अवसरी- सध्या सोशल मीडियावर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांना हरवण्यासंदर्भात विरोधक मेसेज टाकत आहेत. वळसे पाटील यांचे काम प्रभावी असून विकासाला चालना देणारे आहे. त्यामुळे त्यांच्या पराभवाबद्दल बोलणाऱ्यांनी आपली भाषा आपल्या योग्यतेप्रमाणे वापरावी. खासदारकीच्या निवडणुकीत शांत, संयमीपणे प्रचार केला होता. परंतु; विधानसभा निवडणुकीत विरोधकांना जशाच तसे उत्तर देऊन आक्रमकपणे प्रचार केला जाईल, असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे महिलांच्या वतीने शिरुर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला होता. सत्काराला उत्तर देताना खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, शरद सहकारी बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष ऍड. विष्णु हिंगे पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात, पंचायत समितीचे सभापती उषा कानडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील, दगडू शिंदे, शांताराम हिंगे, पंचायत समितीचे सदस्य संतोष भोर, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुषमा शिंदे, युवक अध्यक्ष नीलेश थोरात यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शिरुर लोकसभा मतदारसंघातील विकासाची प्रलंबित कामे करण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहिल. माझी प्रतिमा ही मालिकेत नसून सर्व सामान्य जनतेच्या मनात आहे. मतदार संघातील जनतेने माझ्यावर मतदान रूपी विश्वास दाखवला आहे. त्यांच्या विश्वासाला उतराई होण्यासाठी विकासाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही खासदार डॉ. कोल्हे यांनी दिली.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पूर्वीचे खासदार नेहमी आव्हान द्यायचे की माझ्या विरोधात कोणीही निवडणूक लढवू शकत नाही. त्यांना गर्व झाल्याने मतदारांनीच त्यांना जमिनीवर आणले आहे. भीमाशंकर आणि पराग साखर कारखान्याच्या वतीने तीन चारा छावण्या उभारल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय वायाळ यांनी केले. सूत्रसंचालन जगदीश अभंग यांनी केले तर राजेंद्र भोर यांनी आभार मानले.