वानवडी – नियम मोडून पळणाऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्याकडून वाहतूक पोलीस दंड वसूल करतात. अनेक, घटनांमध्ये कितीतरी किलोमीटर पाठलाग करून बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी वाहने अडवून दंड केला जातो. पण, आज पाठलाग वाहतूक पोलिसांनी केला पण.., तो एका नागरिकाचा रस्त्यावर पडलेला मोबाइल परत करण्यासाठी. त्यामुळे वाहतूक पोलीस हे दंडा आकारण्यासाठीच नव्हे तर वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी, वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी असतात, याची प्रचिती नागरिकांना आली.
या वानवडी फातीमानगर चौकात वाहतूक नियमन करत असताना दुचाकीवरून वेगाने जाणाऱ्या सुरेश गोरवे यांच्या खिशातून महागडा मोबाइल रस्त्यावर पडला. ही बाब वाहतूक पोलीस दयानंद गायकवाड, अश्विनी तिडके यांच्या लक्षात आली. गायकवाड यांनी मोबाइल ताब्यात घेत गोरवे यांचा पाठलाग केला.
काही अंतर गेल्यानंतर गोरवे यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले. हा काय प्रकार सुरू आहे, अशा विचारातून गोरवे यांचा गोंधळ उडालेला असतानाच गायकवाड यांनी मोबाइल पडल्याचे व तो सापडल्याचे सांगितले.
गोरवे यांच्याकडून खात्री करून घेत त्यांचा मोबाइल त्यांना परत करण्यात आला. वाहतूक पोलिसांबाबत असलेले गैरसमज, अशा घटनांतून दूर होत असल्याचे गोरवे यांनी सांगत पोलिसांचे आभार मानले.