पुणे -करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यांतर्गत रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. यामुळे प्रशासनाकडून अत्यल्प प्रतिसाद असणाऱ्या गाड्या रद्द करण्यात येत आहेत. 30 जूनपर्यंत पुणे-फलटण-पुणे डेमू, लोणंद-फलटण-लोणंद डेमू रद्द केली आहे. याशिवाय, पुणे-मुंबई, पुणे-नागपूर आदी मार्गांवरील गाड्या रद्द केल्या आहेत.
मागील वर्षभरापासून रेल्वेकडून विशेष गाड्या चालवण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून उत्तरेकडे आणि पूर्वेकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने या मार्गावरील गाड्यांमध्ये वाढ केली होती. तर, दक्षिणकडे आणि राज्यांतर्गत धावणाऱ्या गाड्यांना प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आरक्षणदेखील झाले नसल्याने गाड्या रिकाम्या धावत होत्या. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कमी प्रतिसाद असणाऱ्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
30 जूनपर्यंत पुणे-फलटण-पुणे डेमू, लोणंद-फलटण-लोणंद डेमू, मुंबई-पुणे-मुंबई एक्स्प्रेस रद्द केली आहे. यामुळे अत्यावश्यक कामांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार आहे. याशिवाय पुणे-अहमदाबाद-पुणे, पुणे-नागपूर-पुणे, पुणे-अमरावती-पुणे, पुणे-अजनी-पुणे, कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर, दादर-पंढरपूर-दादर, दादर-शिर्डी-दादर, मुंबई-गदग-मुंबई, मुंबई-कोल्हापूर-मुंबई, मुंबई- बिदर-मुंबई, मुंबई-सोलापूर-मुंबई, मुंबई-लातूर-मुंबई या मार्गांवरील अत्यल्प प्रतिसाद असणाऱ्या विशेष गाड्या येत्या जून अखेरपर्यंत रद्द केल्या आहेत.
रेल्वेकडून सध्या मालवाहतुकीवर भर
रेल्वेकडून सध्या मालवाहतुकीवर भर देण्यात येत असून, मागील काही दिवसांपासून यामध्ये वाढ होत आहे. रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिलमध्ये 2 हजार 637 वॅगनद्वारे मालगाड्या पाठवल्या असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 88 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर वॅगनच्या तुलनेत यंदा सुमारे 1 हजार 200 अधिक वॅगनद्वारे वाहतूक केली आहे. रेल्वेच्या पुणे विभागाकडून विविध प्रकाराच्या वस्तुंची वाहतूक करण्यात येते. यामध्ये ऑटोमोबाइल, खते, साखर, पेट्रोलियम पदार्थ आदींचा समावेश आहे.
पुणे- हटियादरम्यान विशेष गाडी
प्रवाशांची अधिक संख्या असल्याने प्रशासनाने 8 मे रोजी पुणे ते हटिया मार्गावर अतिरिक्त विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, अकोला आदी स्थानकांवर थांबणार आहे.