नवी दिल्ली: देशात करोनाची बाधा झालेल्या रुग्णांपैकी गेल्या 24 तासांत 4,835 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण 91,818 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत असून ते आता 48.19 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 18 मे रोजी 38.29 टक्के होते. 3 मे रोजी 26.59 टक्के तर 15 एप्रिल रोजी 11.42 टक्के होते.
आजमितीस सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखाली 93,322 रुग्ण आहेत. मृत्यू दर 2.83 टक्के आहे. 18 मे रोजी मृत्यू दर 3.15 टक्के तर 3 मे रोजी 3.25 टक्के होता तर 15 एप्रिल रोजी 3.30 टक्के होता. देशात मृत्यू दर सातत्याने कमी होताना दिसत आहे. आहे. एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना, दुसरीकडे मृत्यू दर कमी होत आहे.
जगभरातील रुग्णांच्या संख्येच्या तुलनेतील मृत्यूदर 6.19 टक्के आहे. करोनाबाधित अन्य प्रमुख देशांपैकी अमेरिका-5.92, ब्रिटन-14.07, इटली-14.33, स्पेन-12.12, फ्रान्स-19.35, ब्राझील-5.99, बेल्जियम-16.25, मेक्सिको-11.13, जर्मनी-4.68, इराण-5.19, कॅनडा-7.80 आणि नेदरलॅन्डमधील मृत्यूदर 12.98 टक्के इतका आहे. त्या तुलनेत भारताचा मृत्यूदर खूपच कमी म्हणजे 2.83 टक्के इतका आहे.
देशभरात 472 शासकीय आणि 204 खाजगी अशा एकूण 676 प्रयोगशाळांद्वारे रुग्णांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. ही चाचणी घेण्याची क्षमता खासगी प्रयोगशाळांच्या सहभागाने वाढली आहे. यात एकत्रितपणे कोविड -19 साठी आतापर्यंत एकूण, 38,37,207 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे, तर काल 1,00,180 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.