नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरचे सर्व प्रकारचे गतीरोधक हटविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाहतूक, विशेषत: टोल नाक्याजवळची वाहतूक विना अडथळा रहावी या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
टोल नाक्यावर फास्टॅगच्या यशस्वी अंमलबजावणी आणि रोखीच्या टोल मार्गिकांचे फास्टॅग मार्गिकांमधे परिवर्तन करण्याबरोबरच सुरळीत वाहतुकीसाठी टोल नाक्यावरचे गतीरोधक, रंबल स्ट्रिप्स तातडीने हटवण्यात येत आहेत.
गतीरोधकांमुळे विलंब, वाहनांना हानी, इंधनाचा जास्त वापर आणि प्रवाशांना असुविधा होत असे. गतीरोधक हटवण्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होण्याबरोबरच वाहनांची विशेषत: रुग्णवाहिकांची तसेच वृद्ध आणि आजारी व्यक्तींना घेऊन जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरळीत होणार आहे.
फास्टॅगद्वारे टोल गोळा करण्याची 15 डिसेंबर 2019 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. महामार्गावर वाहनांची सुरळीत वाहतूक रहावी हा या मागचा उद्देश आहे. याचे सकारात्मक परिणाम प्रवाशांना जाणवत आहेत. गतीरोधक मुक्त महामार्ग हे राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षित, सुरळीत प्रवासासाठीच्या कटिबद्धतेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.