गोंदवले, प्रतिनिधी
निष्ठतेने काम करणारा कार्यकर्ता राष्ट्रवादीला कदापी चालत नाही अशा कार्यकर्त्यांवर अन्याय त्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवणार्या राष्ट्रवादीला आता हद्दपार करण्याची वेळ आली असून माझ्या माण खटाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे अस्तित्व संपवल्या शिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन शेखर गोरे यांनी केले.
औंध जि.प.गटात माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेद्वाराच्या प्रचारादरम्यान कोेपरासभेत ते बोलत होते. यावेळी अलीमभाई मोदी ,राजाभाऊ देशमुख, संदीप इंगळे ,वसंतराव गोसावी ,धनाजी आंबे ,प्रकाश महंत ,सावता यादव ,गणेश चव्हाण , विनोद कदम ,प्रदीप गुजर,चंद्रकांत पवार,मंगेश इंगळे तसेच औंध जि.प.गट व गणातील आदी प्रमुख कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते .
शेखर गोरे म्हणाले, अस्थित्व संपत चाललेल्या राष्ट्रवादी पक्षाला गतवैभव प्राप्त करून सर्व सत्तास्थाने ताब्यात आणून दिली तरी या राष्ट्रवादीचे भागले नाही.विधानपरिषद निवडणूकीत मला जाणीवपूर्वक पाडण्याचे काम पक्षातील काही गद्दारांनी केले.
विरोधकांच्या बरोबरीने याच गद्दारांनी मला मोका लावण्यासाठीही प्रयत्न केले. त्या गद्दरांच्या कृत्याचा पाढा पवार साहेबांसमोर मांडूनही त्यावर एकही शब्द ही न बोलणार्या साहेबांना महानच म्हणावे लागेल.त्यांच्या या दुटप्पीपणामुळेच आज पक्षावर ही वेळ आली आहे.जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेतेमंडळींना माण खटावचा आमदार राष्ट्रवादीचा नको आहे.
मतदारसंघ विरोधकांकडे गेला तरी चालेल पण राष्ट्रवादीकडे येता कामा नये.यासाठी गटातटाच्या राजकारणात गुंतवून टाकायचे उद्योग त्यांनी सुरू केले आहेत.
अन्यायाविरोधात न्याय मागून तो मिळत नसेल तर त्या पक्षात राहून तरी काय फायदा? म्हणूनच मी कार्यकर्त्यांना विचारात घेत भाजपाच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचे जाहीर केले आहे. पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करूनही अन्याय करणार्या राष्ट्रवादीला येणार्या काळात माण खटावमध्ये त्यांची जागा दाखवून देऊन हद्दपार करून टाका असे आवाहनही शेखर गोरे यांनी केले.
माझ्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिड वर्षे पवार साहेबांच्याकडे वेळ मागत होतो. मात्र त्यांनी वेळ दिला नाही म्हणून फलटणच्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांनी न्याय मागण्याचा प्रयत्न केला. तर तो दडपशाहीने मागू दिला गेला नाही.
उलट याला राड्याचे स्वरूप देत पवार साहेबांच्या नादाला लागू नका, ते तुमचे सर्व धंदे बंद पाडतील असे अनेकजण म्हणू लागले. अरे काय मोगलाई लागलीय का? मी काय गँगस्टर नाही, उन्हातान्हात कष्ट करतोय त्यामुळे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही.
मतदारंघात राष्ट्रवादीने आपला फक्त वापर करून घेतला आहे. पक्ष संपत चालला असताना तुम्हा सर्वांच्या सहकार्याने त्या पक्षाला उभारी देण्याचे काम केले. तरीही अशी वागणूक मिळत असेल तर तिथे थांबून काय उपयोग म्हणूनच कार्यकर्त्यांना विश्वासात घेत वेगळा विचार केला आहे.अस्तित्व संपत चाललेल्या राष्ट्रवादीला उभारी देण्याचे काम शेखर गोरे ज्याप्रमाणे करू शकतो.
त्याचप्रकारे अन्याय केलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा त्यांच्या अस्थित्वाची जागा दाखवून द्यायला हा शेखर गोरे मागे पुढे पाहणार नसल्याचा इशारा देतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून औंध परिसरातील गावांसाठी फलदायी ठरणारी ब्रम्हपुरी योजना मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरि प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने देशाला चांगले नेतृत्व मिळाले आहे.पुन्हा एकदा देशाची सेवा करण्याची संधी देण्यासाठी त्यांना खंबीर पाठिंबा देणे गरजेचे असल्याने माढा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांना आपल्या मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही शेखर गोरे यांनी केले आहे.
ये शेखर गोरे कौन है….!
फलटणच्या संवाद मेळाव्यात राष्ट्रवादी पक्षाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी गेल्यानंतर दाद मागू दिली नाही त्यावेळी जो गोंधळ उडाला तो राज्याबरोबरच देशभरात गाजला.त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले ये शेखर गोरे कौन है…त्यामुळे आपले नाव दिल्लीपर्यंत पोहचले आहे.त्यावेळचा तो राडा नव्हता तर न्याय मागण्याचा प्रकार होता.मात्र याच राष्ट्रवादीने त्यावेळी दडपशाही दाखवून न्याय मागून दिला नाही.