नवी दिल्ली : राफेल प्रकरणावरून कॉंग्रेस आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारविरोधात आकसापोटी निराधार मोहीम राबवली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ती मोहीम राबवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. आता कॉंग्रेसने माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरूवारी केली.
राफेल प्रकरणावरून विरोधकांनी संसदेच्या कामकाजात अडथळे आणले. जनतेच्या हितासाठी वाया गेलेला तो वेळ वापरता येऊ शकला असता. कॉंग्रेस आणि त्या पक्षाच्या नेत्यांसाठी राष्ट्रहितापेक्षा राजकारण करण्याला महत्व आहे. त्यामुळे त्यांनी आता देशाची माफी मागितली पाहिजे.
मोदी सरकारचे कामकाज भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक आहे. त्यावर न्यायालयाच्या निकालामुळे शिक्कामोर्तब झाले आहे, अशी प्रतिक्रिया शहा यांनी ट्विटरवरून दिली.