प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर : 30 हजारांचा दंड वसूल
राजगुरूनगर- प्लॅस्टिक बंदी असतानाही राजगुरूनगर शहरात सर्रासपणे प्लॅस्टिक वापरणाऱ्या कपड्यांच्या नामांकित सहा दुकानांवर शुक्रवारी (दि. 2) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापे टाकून प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करीत प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे 30 हजारांचा दंड वसूल केला.
राजगुरुनगर शहरात प्लॉटिक बंदी असताना राजरोसपणे प्लॅस्टिक पिशव्याचा वापर होत आहे. राजगुरूनगर परिषदेने अनेकदा दुकानदारांना आवाहन करूनही दुकानदार नगरपरिषदेच्या आवाहनाला न जुमानता प्लॅस्टिक विक्री करीत होते. प्लॅस्टिक वस्तूवर शासनाने बंदी केल्यानंतर राजगुरूनगर शहरात नगरपरिषदेने मोठा गाजावाजा करुन दुकांनदार व्यापारी यांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळा, असे अवाहन केले होते. मात्र, काही दिवसांतच या निर्णयाला व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. मोठे-मोठे फ्लेक्स लावून राजगुरूनगर शहर कसे स्वच्छ आहे हे दाखवण्यात आले. शासनाने प्लॅस्टिक बंदी जाहीर केल्यानंतरही शहरातही प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे.
“युझ अँड थ्रो’ संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. 35 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना ही बंदी आहे. मात्र शहरात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. बाजारात ग्राहक सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांची मागणी करतात. प्लॅस्टिकचा कचरा वाढू लागला आहे. यंत्रणेकडून अंमलबजावणी होत नसल्याने प्लॅस्टिकच्या वापरावर नियंत्रण मिळवता येत नाही.
- या दुकानदारांवर कारवाई
जुना मोटार स्डॅड, वाडा रोड येथील मोमीन, शुभम, आदित्य, भावना,श्रीकृष्ण कलेक्शन, हाफिज एम्पोरियमया कापड दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. - जप्त केलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या पुन्हा वापरता येणार नाही या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. यापुढेही अशी वेळोवेळी कारवाई करण्यात येणार आहे. प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यावर कडक कारवाई होणार आहे.
– मच्छिंद्र घोलप, मुख्याधिकारी, नगरपरिषद