राजगुरूनगर-नगर परिषदेने आवाहन केल्यानुसार ठेवलेल्या बंदला आज दुसऱ्या दिवशी शहरातील नागरिकांनी 100 टक्के पाठिंबा देत बंद पाळला.
देशात लॉकडाऊनचा आज दहावा दिवस आहे. देशात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. राजगुरूनगर शहरासह तालुक्यात अजून एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही तरीही खबरदारी म्हणून तालुक्यात कडकडीत लॉकडाऊनची अंमलबजावणी होत आहे. चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर या शहरांमध्ये मोठी लोकसंख्या असल्याने लॉकडाऊनच्या काळात भाजी, किराणा खरेदीला लोक रस्त्यावर उतरत होते. त्यामुळे राजगुरूनगर, चाकण, आळंदी नगरपरिषदेने लॉकडाऊनबरोबरच शहरे पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राजगुरुनगर नगरपरिषदेने गुरुवार ते शनिवार असा तीन दिवसाचा बंद पाळला आहे. या काळात नागरिकांनी घरी राहणे पसंत केले आहेत; मात्र काही महाभाग रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत. मेडिकल सुरु असल्याने त्यामध्ये औषधे घेण्याच्या बहाण्याने काही रस्त्यावर येत आहेत. करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शहरात प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.