ग्रामस्थांनी केली जीवनावश्यक वस्तूंची मदत
यवत – कोल्हापूर आणि सांगली शहराला महापुराचा फटका बसला असून या दोन्ही जिल्ह्यातील हजारो गावे आठ दिवसांपासून पाण्याखाली आहेत. या भागातील लाखो नागरिकांना स्थलांतरीत करण्यात येत असून या नैसर्गिक संकटामुळे बाधित नागरिकांचे अन्न, पाण्यावाचून हाल होत आहेत. या पुरग्रस्तांना मदतीच्या उद्देशाने यवत परिसरातील ग्रामस्थ मदतीला धावून आले आहेत. ग्रामस्थांनी एकत्र येत कोल्हापूर आणि सांगलीतील पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दोन ट्रक भरून रवाना केल्या आहेत.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुरामुळे बिकट स्थिती निर्माण झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यामुळे पुरग्रस्तांचे हाल होत आहेत. यामुळे गावातून पुरग्रस्तांना मदत द्यावी, असे आवाहन शुक्रवारी (दि.9) नागरिकांना करण्यात आले होते, त्यानुसार यवतकर ग्रामस्थांनी यवत येथील काळभैरवनाथ मंदिर येथे जीवनावश्यक वस्तू स्वयंत्स्फूर्तीने आणून दिल्या.
खुटबाव व नाथाचीवाडी येथील ग्रामस्थांनीही योगदान दिले. महिलांना साड्या, ब्लॅंकेट, लहान मुलांना कपडे, स्वेटर, चटया, सॅनिटरी नॅपकिन, पिण्याच्या पाण्याचा बाटल्या, फळे, भांडी, किराणा सामान, बिस्किटे, कोलगेट, साबण, दूध, दोन हजार लोकांना पुरेल एवढे तयार जेवण जमा करीत दोन ट्रक भरून या जीवनावश्यक वस्तू पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आज दुपारी रवाना पाठविण्यात आल्या. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो तरुण पुढे आले आहेत.