रतलाम – प्रथमच मध्यप्रदेशात प्रचार दौऱ्यावर आलेल्या कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज येथील प्रचार सभेत बोलताना मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की गेली पाच वर्ष पंतप्रधान मोदी सतत प्रचार दौरेच करीत होते त्यांनी काम काहीच केले नाही. आपण अनेक वर्ष तपस्या केल्याचा दावा मोदी करतात. पण तपस्या केल्याने माणसांतला अहंकार नाहीसा होतो. मोदींचा अंहकार तर खूपच वाढला आहे असे त्यांनी म्हटले आहे. मोदींना आपल्या वाराणसी मतदारसंघातील गरीबांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पाच मिनीटांचाही वेळ मिळाला नसल्याची टीकाही त्यांनी केली.
त्या म्हणाल्या की सामान्यपणे कोणत्याही पक्षातला राजकारणी माणूस प्रचारात महत्वाचे विषय उपस्थित करतो. तुमच्या समस्या काय आहेत त्या कशा सोडवल्या जातील, पुढील पाच वर्षात मी नेमके काय करणार आहे हे तो सांगत असतो पण मोदीच्या बाबतीत गेल्या पाच वर्षात केवळ अजब सिलसिलाच सुरू राहिला. त्यांनी पाच वर्षात केवळ ठिकठिकाणी जाऊन केवळ प्रचारच केला. त्यांनी प्रत्यक्ष काम केलेच नाही.
भाजपचा प्रचार आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात फार तफावत आहे असे त्यांनी नमूद केले. कॉंग्रेस आपल्या आश्वासनांची पुर्तता करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. मोदींनी प्रचारात भलत्याच मुद्द्यांना महत्व दिले आहे पण आपल्या अपुऱ्या राहिलेल्या आश्वासनांबद्दल मात्र ते काहीही बोलत नाहीत. तुमचा केवळ राजकारणासाठी वापर करून घेतला जात आहे, त्यामुळे तुम्ही तुमची ताकद ओळखा आणि तुमचे मत वाया जाणार नाह याची काळजी घ्या असे आवाहनही प्रियांका गांधी यांनी मतदारांना केले.