पुणे : “कोरोनामुळे, मुलांच्या हातात मोबाईल द्यायचा की नाही ? हा प्रश्न निकाली निघाला आहे. ते आता अनिवार्य आहे. आपलं जग भौतिक आणि आभासी अशा दोन प्रकारात विस्तारलेले आहे. लोक खूप वेळ आभासी जगात राहतात. तंत्रज्ञानाच्या गैरवापराने ते व्यसनाधीन होतात. यासाठी सायबर संस्कारांचा पहिला धडा म्हणजे सगळ्या लहानथोरांनी आठवड्यातून किमान एक दिवस मोबाईल पासून दूर राहायचं.( मोबाईल चा उपास ) असा मोलाचा सल्ला संगणक तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी पालकांना दिला.
नगरसेविका आणि बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या वतीने सायबर संस्कार या विषयावर पालक सभेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. या सभेत दहा वर्षांवरील, स्वतंत्रपणे मोबाईल वापरणारी सुमारे पन्नास मुलेही पालकांसह उपस्थित होती.
डॉ. शिकारपूर म्हणाले की, “तुमचा ईमेल आयडी, पासवर्ड,ओटीपी कोणालाही शेअर करू नका. जी व्यक्ती तुम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे, तिचीच फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा. फेसबुकवर अनेक मित्र असणे ही श्रीमंती नव्हे तर भौतिक जगातील मित्रच खरे असतात. मुलांना सोशल मिडिया वर काहीही वेगळं जाणवलं तर लगेच पालकांशी व पोलिसांशी संपर्क साधावा ” असे आवाहन त्यांनी यावेळी मुलांना केले. संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले तर दीपाली बोरा यांनी आभार मानले.