– सर्व खासगी कार्यालये, दुकाने राहणार बंद
– जीवनाश्यक वस्तूंची दुकाने, बॅंका, अत्यावश्यक सेवांना वगळले
– रेल्वे, बसेस सुरूच राहणार
– सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 25 टक्क्यांवर आणणार
मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात करोनाविरोधात सरकारने युद्ध सुरु केले आहे. करोनाच्या विषाणूवर मात करण्यासाठी राज्य सरकारने लॉक डाऊनच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड व नागपूर या चार महानगरातील खासगी कार्यालये, दुकाने, आस्थापना 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. या घोषणेची अंमलबजावणी शुक्रवारी (20 मार्च) मध्यरात्रीपासून होणार असून रेल्वे, बसेस या सार्वजनिक वाहतूकीला बंदमधून वगळण्यात आले आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधांची दुकाने, दूध, बॅंका सुरुच राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारी कार्यालयांत देखील 25 टक्केच कर्मचारी उपस्थिती राहणार आहे.
करोनाने राज्यभरात आपले हातपाय पसरल्यानंतर खबरदारीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्ह, यूटयूब, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजोय मेहता यावेळी उपस्थित होते.
करोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे. जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकाने, आस्थापना व खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.
मात्र सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही. पुढील 15 ते 20 दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील शासकीय कार्यालयांतील उपस्थिती 25 टक्क्यांवर आणणार आहोत. जे दुकाने, आस्थापना चालक जुमानणार नाहीत त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करावी लागणार आहे. याआधी सरकारी कार्यालयांत 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता सरकारी कार्यालये देखील 25 टक्केच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालविण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
बस, रेल्वे सेवा सुरू
काही गोष्टी सरकार आपल्या काळजीसाठी घेत आहे. आपले सहकार्य असू द्या, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री म्हणाले, अनेकांनी सल्ले दिले की बसेस, रेल्वे बंद करा! पण आपली जी मोठी रुग्णालये आहेत, त्यात काम करणारे डॉक्टर्स, सिस्टर्स, कर्मचारी आहेत, अऐॅम्बुलन्स चालवणारे आहेत. त्यांची ने-आण कशी होणार. त्याचबरोबरीने महापालिका कर्मचारी आहेत जे आपले आरोग्य नीट राखण्यासाठी शहराची साफसफाई करतात, पाणी सोडणारे कर्मचारी ये-जा करीत असतात. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतोय की, तूर्त या दोन सेवा बंद न करता इतर सर्व सेवा बंद करीत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
फिरण्यासाठी सुट्टी दिलेली नाही
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी “वर्क फ्रॉम होम’ किंवा कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ फिरण्यासाठी सुट्टी दिली आहे असा कोणीही समज करून घेउ नये. मला खात्री आहे की हे झाल्यानंतर गर्दी पूर्णपणे बंद होईल. गर्दी पूर्णपणे कमी झाली नाही तर रेल्ऐवे आणि बससेवा सुरू ठेवायच्या की नाही याचाही विचार करावा लागेल. हे आपल्या हितासाठी टाकलेले बंधन आहे, असाही इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
राज्यात 52 रूग्ण, 5 जण रोगमुक्त
राज्यात आजच्या घडीला 52 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पण दिलासा देणारी बाब अशी की 5 जण हे रोगमुक्त झाले आहेत. आता पुढचे 14 दिवस या 5 जणांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
अस्थापनांमधील कर्मर्चाऱ्यांचे वेतन बंद करू नका
खासगी कार्यालये, दुकाने बंद राहणार असली तरी त्यांच्या मालक व संबंधितांनी या दिवसांतील किमान वेतन द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. विशेषत: ज्या कर्मचाऱ्यांचे हातावर पोट आहे जे रोजंदारी करतात त्यांना हे वेतन मिळाले पाहिजे. कारण संकटात टिकते आणि टिकवते ती माणुसकी. तेव्हा माणुसकी सोडू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
आर्थिक संकटावरील उपायांसाठी अभ्यासगट
या शहरांमधल्या लोकांत जो काही संभ्रम असेल तर ते तिथले, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलू शकतात. आर्थिक व्यवहार महत्त्वाचा भाग आहे. हे संकट उभं ठाकलं असताना यापुढचं संकट हे आर्थिक संकट आहे. त्यावर उपाय शोधतो आहोत. त्यासाठी अभ्यासगट नेमला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
घरात राहूनच युद्ध जिंकायचे!
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, आपल्यावरील संकट ओळखणारी आहे, एकमेकांना सहकार्य करणारी आहे. महाराष्ट्र लढणारा आहे. अनेकदा रणांगणात उतरून लढायचं असतं, ती लढाई आपले डॉक्टर्स आणि इतर स्टाफ लढतोय. आपण मात्र घरात बसून या लढाईवर विजय मिळवायचा आहे. सरकार म्हणून सर्व यंत्रणा सज्ज आहे. सरकार लढतं आहे, आपलं सहकार्य महत्त्वाचं आहे. या सहकार्याच्या जोरावर आपण ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या जनजागृतीसाठी कलाकारांनी, क्रीडा पटूंनी बनविलेल्या फिल्मबद्दल त्यांचे आभार मानले.