मुंबई – राज्यावर करोनाचं भीषण संकट आलं आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहे. रेमडेसीवीरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिराव लागत आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधीपक्षनेते यांच्यात वादंग सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच फटकारलं आहे.
मीदेखील राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. पण संकटाच्या काळात कधीही असला खेळ खेळलो नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं. ते जळगाव येथे बोलत होते. खडसे म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी संकट आले अथवा आकस्मिक संकटाचा प्रसंग उद्भवला, मग तो किल्लारीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत, अशावेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केले आहे.
राज्यात विरोधी पक्षनेता म्हणूनही मी सुद्धा काम केले आहे. पण, संकटाच्या काळात असा कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळला नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.