उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आदेश
जेजुरी- पुरंदर तालुक्यातील जेजुरी औद्योगिक वसाहत टप्पा क्र.5 मधील विस्तारीकरणामधील मु.मावडी क.प., कोळविहिरे व नावळी आदी तीन गावांच्या परिसरातील बागायती जमिनींवर टाकलेले औद्योगिक विकास महामंडळाचे शिक्के हटविण्याचे आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत.
मंत्रालयात उद्योगमंत्र्यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे. मंत्री शिवतारे यांच्या मागणीनुसार मंगळवारी (दि.30 जुलै) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत विशेष बैठक बोलविली होती. बैठकीला मंत्री शिवतारे यांच्यासह माजी सभापती अतुल म्हस्के, प्रा. हनुमंत चाचर, नावळीचे सरपंच शांताराम गिरमे, शांताराम म्हस्के, अरुण म्हस्के, प्रभाकर तोरवे, खंडू मोटे, संजय यादव, प्रकाश भामे, महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, विशेष भूसंपादन अधिकारी ठोंबरे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मावडी गाव संपूर्ण बागायती असल्यामुळे मावडीचे शिक्के हटविण्यात येणार आहेत तर नावळी हद्दीत सर्वेक्षणात ज्या जमिनी बागायती असल्याचे दिसून आले आहे त्या वगळण्यात येणार आहेत. कोळविहिरे गावचेही सर्वेक्षण करून बागायती जमिनी वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. नावळी येथील मोटे कुरण परिसरातील जमिनीवर एमआयडीसीचे काम सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ज्या जमिनी संपादित होणार आहेत त्यांना जास्तीत जास्त बाजारभाव देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. लवकरच याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात येईल असेही उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले.