रचकोंडा (तेलंगणा) : जमीनीच्या वादातून महिला तहसीलदाराला कार्यालयातच जीवंत जाळण्याची घटना अब्दुलपूरमेट येथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेत तहसीलदार विजया रेड्डी (वय 35) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी धावलेले दोन सहकारीही गंभीररीत्या भाजले गेले आहेत. यात हल्लेखोरही भाजला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
भरदुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुरेश या स्थानिक नागरिकाने त्यांच्यावर पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला. जखमी झालेले तिघेही सुमारे 50 ते 60 टक्के भाजले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून असे टोकाचे पाऊल उचलण्यासाठी नेमके कोणते कारण कारणीभूत ठरले याचाही तपास केला जात आहे,असे पोलिसांनी सांगितले.