162 आमदारांच्या सह्यांचे पत्र दिले राज्यपालांना
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर राज्यात राजकिय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडे संख्याबळ नसल्याचा दावा करत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी संधी देण्याची विंनती केली. त्यासाठी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी पाठबळ असलेल्या 162 आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना दिले. या पत्रावरून राज्यपाल कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. या तिन्ही पक्षांमध्ये सत्ता स्थापनेची चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी घात केला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्यांचे पत्र दिल्यानंतर शनिवारी अवघा महाराष्ट्र साखर झोपेत असताना भाजपने गुपचूप शपथविधी उरकला. शपथविधी सोहोळ्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना मोठा धक्का बसला होता.
दरम्यान, दोन दिवसांच्या घडामोडीनंतर शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासोहब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सहयोगी पक्षासह 162 आमदारांच्या सह्यांचे पत्र आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयात दिले.
राज्यपाल कोश्यारी नवी दिल्लीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात हे पत्र सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबु आझमी, के. पी. पाडवी आदी उपस्थित होते. सत्तास्थापनेसाठी राज्यपालांना पत्र सादर केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकारने शपथ घेतली पण त्यांच्याकडे संख्याबळ पुरेसे नव्हते, असे त्यांनीच सुरवातीला स्पष्ट केले होते. आताही त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने बहुमत नाही. त्यामुळे भाजपचे सरकार बहुमत सिध्द करण्यास असमर्थ ठरल्यानंतर आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस, समाजवादी पक्ष स्वाभीमानी शेतकरी संघटना, सीपीएम व सात अपक्ष या सर्वांच्या पाठिंब्याने आम्ही सरकार स्थापन करू शकतो व सरकार स्थापन करण्याचा दावा आम्ही राज्यपालांकडे केला आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
लोकशाहीची पायमल्ली – एकनाथ शिंदे
23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शपथ ही लोकशाहीला धरून नव्हती. त्यांनी घेतलेली शपथ लोकशाहीची पायमल्ली आहे. त्यांच्याकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. म्हणून त्यांनी सरकार स्थापन करणार नाही, असे पूर्वी त्यांनी पत्र दिले होते. आमच्याकडे आवश्यक संख्याबळ होते, पण आम्ही वेळ वाढवून देण्याची विनंती आम्हाला राज्यपालांकडे केली होती. पण आमची मागणी राज्यपालांनी त्यावेळी दुर्देवाने फेटाळून लावली होती. ती लोकशाहीची पायमल्ली होती. पण आता दूध का दूध -पानी का पानी सिध्द करण्याची वेळ आली आह, असे शिवसेनेचे विधिमंडळातील पक्ष नेते एकनाथ शिंदे म्हणाले. अल्पमतातील सरकार आवश्यक संख्याबळ नसताना घाईगडबडीने पहाटे शपथविधी झाला. त्यांच्याकडे संख्याबळ असताना उजळमाथ्याने दिवसाढवळ्या शपथ घेतली असती. आता जे सरकार स्थापन झाले आहे ते लोकशाहीला धरून नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.