महाळुंगे इंगळे – येथील परिसरात सततच्या रिमझिम पावसामुळे निसरड्या रस्त्यांवरील अपघातात मोठी वाढ झाली आहेत. त्यातही सर्वात जास्त अपघात चाकण-तळेगाव दाभाडे या महामार्गावर होत आहेत.
चाकण-तळेगाव दाभाडे हा जिल्हा महामार्ग नेहमी अवजड वाहनांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. अनेक प्रकारच्या सामग्रीची वाहतूक करणारे अवजड ट्रक या महामार्गावरून भरधाव धावत असतात. वर्दळीच्या या रस्त्यावर घडणाऱ्या अपघातात अनेक बळी गेले आहेत. सध्याच्या पावसाळ्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, यासाठी महामार्गावर अपघात नियंत्रणासाठी विशेष दक्षतेची गरज निर्माण झाली आहे. पावसामुळे या महामार्गावर निसरड्या झालेल्या रस्त्यावर मोटार कार आणि दुचाकी चालकांची समोरासमोर धडक होऊन अपघात होत आहेत, त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
पावसाळ्यात खराबवाडी, नाणेकरवाडी, महाळुंगे इंगळे, खालुंब्रे आदी गावांच्या हद्दीतील रस्त्यांवरून वाहन घसरल्याने रस्त्यातील खड्ड्यांमुळे, वाहतुकीचे नियम डावलून चुकीच्या बाजूने वाहने चालवित नेल्याने, दारू पिऊन वाहने दामटणे, तुफान वेगाने गाड्या पळवणे, वेगमर्यादा ओलांडण्याचा मोह यांमुळे अपघात होत आहेत. त्यातच आता पावसामुळे महामार्गाच्या कडेला असलेल्या मातीमुळे अर्ध्या रस्त्यावर चिखल येत असल्याने रस्ते निसरडे होवून रस्ते अपघात वाढले आहेत.