दोन वर्षांपासून पीएमसी केअरची तक्रार प्रलंबित
पुणे : सरकारी काम आणि दोन महिने थांब याचा अनुभव प्रत्येक शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना येतो. मात्र, एका किरकोळ तक्रारीसाठी तब्बल 2 वर्षे झाली तरी पालिकेस वेळ मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत केंद्रशासनाचा पुरस्कार मिळालेल्या महापालिकेच्या “पीएमसी केअर’ या तक्रार प्रणालीवरील हा प्रकार असून या तक्रार निराकरणासाठी तक्रारदाराला तक्रार सोडविण्यासाठी महापालिकेकडे उंच शिडी नाही. शिडी मिळाल्यानंतर कारवाई केली जाईल असे धक्कादायक उत्तर देण्यात आले आहे.
सिटी आय संस्थेचे संजय शितोळे यांनी दोन वर्षांपूर्वी लक्ष्मी चित्रपटगृहाच्या समोरील बाजूस खासगी वाहतूकदारांच्या बस लागतात, त्या परिसरात महापालिकेने पथदिव्यावर नो पार्किंगचा फलक लावला होता. हा फलक तब्बल 15 ते 20 फूट उंचावर लावला आहे. त्यामुळे तो वाहनचालकांना दिसतच नाही. त्यामुळे शितोळे यांनी पीएमसी केअर आणि वाहतूक पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. त्यावेळी त्यांना पीएमसी केअरवर महापालिकेकडे उंच शिडी नाही, त्यामुळे शिडी मिळाल्यानंतर नक्की कारवाई केली जात असे कळवित तक्रार बंद करण्यात आली. त्यानंतर गेली दोन वर्ष हा फलक तसाच उंचीवर असल्याने शितोळे यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा पीएमसी केअरवर तक्रार केली.
तर त्यांना तक्रार संबधित अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आली असून लवकरच कारवाई केली जाईल असे कळविण्यात आले आहे. त्यामुळे दोन वर्षानंतरही तक्रारीची तीच स्थिती असल्याचे शितोळे यांनी सांगितले. तसेच याबाबत त्यांनी आयुक्तांकडेही लेखी तक्रार केली आहे.
सर्वसामान्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पीएमसी केअर सुरू केले असले तरी त्यावर जबाबदारी झटकली जात असल्याचे उत्तरे दिली जात असल्याचेही शितोळे यांनी सांगितले. बिबवेवाडी परिसरात एक बेवारस कार रस्त्यावर असून त्याच्या आसपास कचरा साचत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. मात्र, हे काम आरटीओ किंवा पोलिसांचे असल्याचे सांगत, त्यांची तक्रार बंद करण्यात आली त्यानंतर त्यांनी पोलीस व आरटीओ कडे तक्रार केली असता त्यांना महापालिकेस तक्रार करा असे सांगण्यात आले. त्यामुळे अशा प्रकारे केवळ पुरस्कारासाठी महापालिका काम करत असेल तर आमचा वेळ, पैसा कशासाठी पालिका खर्च करते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.