मुंबई – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लवकरच कोसळणार असून त्यानंतर राज्यात तीन पर्याय अस्तित्त्वात येऊ शकतात, असे भाजपा नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्यावर सातत्याने विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. हे सरकार लवकरच कोसळेल, असा दावा विरोधी पक्षाकडून केला जात आहे.
नारायण राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकार कोसळल्यानंतर काय होणार याचं उत्तर दिलं आहे. ‘महाराष्ट्रासाठी हे सरकार पोषक नाही. हे सरकार गेल्यानंतर दोन मार्ग आहेत,’ असं म्हणत नारायण राणेंनी सरकार कोसळल्यानंतरचे पर्याय सुचवले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर अन्य दोन पक्षांपैकी एका पक्षासोबत युती होऊ शकते किंवा राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्याचबरोबर, राज्यात पुन्हा निवडणुका होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. शिवाय, शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस समीकरण होऊ शकतं, तर राज्यात कोणतंही समीकरण होऊ शकतं,’ असं राणे यांनी म्हटलं असल्यानं खळबळ उडाली आहे.
नारायण राणे यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर जोरदार शब्दांत “प्रहार’ केला. या सरकारने 35 हजार कोटींचं कर्ज मागील सहा महिन्यात काढलं असून राज्याला दिवाळखोरीत नेलं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळाला हे दुर्दैव आहे. सामनाचे ठाकरे गद्दरी करुन मुख्यमंत्री झाले आहेत, असेही राणे म्हणाले.
‘मराठ्यांना आरक्षण द्यावं असं शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना वाटत नाही. ते या विरोधात आहेत, असा आरोप करतानाच त्यांनी सर्वोच्च न्यायलयात चांगले वकील नेमण्याची गरज आहे, पण सरकारने तसे वकील दिलं नाही,’ असा आरोप राणे यांनी केला आहे.