मुंबई : विधानसभा निवडणुकीत उतरायचे की नाही याबाबत द्विधा मन:स्थितीत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेच्या रिंगणात उडी घेण्याचे निश्चत केले असून पुणे, नाशिक आणि मुंबईवर लक्ष केंद्रीत करून 100 जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. त्यामुळे युती न झाल्यास त्याचा कोणाला फटका बसण्याची शक्यता आहे याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढविले जात आहेत.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली त्यात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून उनेदवारांच्या नावाची यादी तयार करण्याचे आदेश दिल्याचे सुत्रांनी सांगितले. कोणत्याही पक्षासोबत न जाता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार मनसेने केला आहे. मनसेने लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणताही उमेदवार उभा न करता अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा प्रचार केला होता. त्यांचा लाव रे तो व्हिडिओ ही वाक्येही खूप गाजली होती.
काही काळापुर्वी मनसेत निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे की नाही याबाबत संधिग्धता होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला असला तरी त्याबाबतची अधिकृत घोषणा दुपारपर्यंत करण्यात आली नव्हती. मनसेने निवडणूक लढवण्यामुळे त्याचा फटका कोणाला बसेल याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. काही दिवसांपुर्वी ठाण्यात मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाने लिफ्टचा दरवाजा उघडा ठेवला म्हणून बेदम मारहाण केली होती. त्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने मराठी साथ मनसेला मिळते का याबाबतही उत्सुकता आहे.